कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज, मंगळवारी पावसाचा जोर कमी झाला. मात्र, तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढच होत आहे. संततधार पावसाने आज थोडी उघडीप दिली असली तरी अधून-मधून पावसाच्या सरी बरसत होत्या. जिल्ह्यात गगनबावड्यासह पाच तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली असून ७५ बंधारे पाण्याखाली गेल्या वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोल्हापूरहून तळ कोकणाला जोडणारे दोन्ही मार्गावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे.काल, सोमवारी दिवसभर धुवाधार पाऊस कोसळत राहिला. रात्रीही पावसाचा जोर होता, मात्र आज, मंगळवारी पहाटेपासून पावसाचा जोर ओसरला. अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. धरण क्षेत्रात मात्र अद्याप पावसाचा जोर असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ‘वारणा’ व ‘दूधगंगे’तून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पावसाने उघडीप दिली असली तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.मंगळवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी ३६.७ फुटापर्यंत होती. त्यानंतर दुपारी एक पर्यंत ३७.७ फुटापर्यंत गेली. म्हणजे पावसाने विश्रांती घेतल्याने पाच तासात केवळ फुटाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. तब्बल ७५ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
राधानगरीचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार
राधानगरी धरण मंगळवारी सायंकाळपर्यंत ९७ टक्के भरले होते, त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडू शकतात. पहाटे पाच वाजता आजरा तालुक्यातील ‘चित्री’ धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आतापर्यंत चार धरणे व एक लघु पाटबंधारे प्रकल्प भरले आहेत.
६९ इमारतींची पडझडजिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १ सार्वजनिक व ६८ खासगी मालमत्तांची पडझड होऊन २० लाख १४ हजारांचे नुकसान झाले आहे.
जोरदार वाऱ्याने पाऊस सरकलावाऱ्यांच्या दिशेवरच पावसाचे प्रमाण अवलंबून असते, साधारणता पूर्वीपासून वारे आणि पावसाचा ठोकताळा बांधला जातो. त्यानुसार पावसाबरोबर वारे वाहू लागले तर, पाऊस अधिक लागतो. कोरडे वारे वाहू लागले तर, पाऊस मागे सरकतो, असा अंदाज वर्तवला जातो.