घरगुती वीज बिल माफीवर सरकार सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:30+5:302021-01-21T04:22:30+5:30
कोल्हापूर : लाॅकडाऊन काळातील घरगुती वीज बिलांच्या माफीसंदर्भात सरकार सकारात्मक आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी ...

घरगुती वीज बिल माफीवर सरकार सकारात्मक
कोल्हापूर : लाॅकडाऊन काळातील घरगुती वीज बिलांच्या माफीसंदर्भात सरकार सकारात्मक आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाला बुधवारी दिले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेट्टी, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर, समीर पाटील कुंभोजकर, मुकुंद माळी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. चर्चेत शेट्टी यांनी शेजारील चार राज्यांनी लॉकडाऊन काळातील वीज बिलांमध्ये सवलत दिली आहे, मग आमचेच राज्य मागे का, असा प्रश्न करीत, आम्ही अजून किती दिवस आंदोलने करायची, अशी थेट विचारणा केली. राज्यभर आंदोलने केली तरीदेखील शासन गांभीर्याने पाहत नाही, याचा अर्थ काय घ्यायचा असे सांगून शेट्टी यांनी आतापर्यंत केलेली आंदोलने व सरकारकडे जनतेच्या वतीने पाठविलेल्या स्मरणपत्रांचे निवेदनच हातात दिले. घरगुती ग्राहक जास्त असल्याने सरकार पैसे नसल्याचे सांगत आहे; पण आज पैसे नाही तर काही काळानंतर महावितरणला द्या, पण जनतेला ताटकळत ठेवू नका, अशी विनंतीच शेट्टी यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत आहे, असे आश्वासन दिले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची विनंती केली; पण या दोघाही मंत्र्यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील असल्याने तुम्ही त्यांच्याकडेच गाऱ्हाणे मांडा, तेच योग्य तो निर्णय घेतील, असे सांगितले.
चौकट ०१
शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदन एन.डी. पाटील यांच्या नावाने आहे, मग त्यांच्या नावावर तुम्ही कसे काय आला आहात अशी मिश्कील विचारणा पवार यांनी केली. त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांच्याच वतीने येथे आलो आहोत, असे सांगत शेट्टी व विक्रांत पाटील किणीकर यांनी एन.डी. पाटील यांच्या वयाचा मान ठेवून तरी लवकर निर्णय घ्या, असा चिमटा काढला.