कोल्हापूर : अहिंसा, प्रेम, प्रामाणिकपणा, सत्य, लोकशाही, बंधुभाव, समानता हेच गांधीजींचे विचार पुढील काळात जगभर चिरंतर राहणार असल्याचे प्रतिपादन गांधीवादी विचारवंत, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केले. समज, गैरसमज पसरवणारी विचारांची विषवल्ली लावताना कोणीच विरोध करत नाही. नंतर मोठे रूप धारण केल्यानंतर ओरडले जाते. आता ही विषवल्ली सत्याच्या आणि ज्ञानाच्या कुऱ्हाडीनेच तोडावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. माेहनदास करमचंद गांधी विचारमंच, गांधी अभ्यास केंद्र शिवाजी विद्यापीठ यांच्यावतीने शनिवारी शाहू स्मारक भवन येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त ‘महात्मा गांधीजी समज आणि गैरसमज’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.
निरंजन टकले म्हणाले, महात्मा गांधीजींच्या विषयी अनेक समज - गैरसमज जाणून बुजून पसरविले गेले. त्यांचा लोकांना द्वेष करावा यासाठीच हा खटाटोप केला जातो. असे असले तरी स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींचे अहिंसेच्या विचाराने लोकांमध्ये बळ निर्माण केले. जगातील सर्वांत मोठ्या असणाऱ्या ब्रिटिशांच्या सैन्याला त्यांनी हतबल केले. देशाला गौरवशील इतिहास असून, त्याकडे गौरवानेच पाहिले पाहिजे. लोकशाही अडचणीत येत असेल, अराजकता पसरू द्यायची नसेल, तर गाधीजींच्या अहिंसेचा स्वीकार करावा लागेल.
चौकट
सरकारविरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नव्हे
सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे देशाच्या विरोधात बोलणे असे होत नाही. पूर्वीच्या सरकारविरोधात बोलूनच सध्याचे सरकार सत्तेवर आले. मग आता सरकारविरोधात बोलले तर देशद्रोह कसा होईल, असे टकले यांनी सांगत भाजपवर निशाणा साधला. समज, गैरसमजाबाबत सतत लोकांना जागे करावे लागेल, असेही ते म्हणाले.
फोटो : ३००१२०२१ कोल निरंजन टकले न्यूज
ओळी : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात शनिवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘महात्मा गांधीजी समज आणि गैरसमज’ या विषयावर व्याख्यान झाले. गांधीवादी विचारवंत, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. भारती पाटील, प्रभाकर पाटील, प्रा. टी. के. सरगर, प्रा. मिलिंद पाटील उपस्थित होते.