मोबाईल ग्राहक सेवा केंद्रांकडून फसवणूक

By Admin | Updated: November 21, 2014 00:54 IST2014-11-21T00:49:07+5:302014-11-21T00:54:45+5:30

ग्राहक पंचायत : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Fraud from mobile customer service centers | मोबाईल ग्राहक सेवा केंद्रांकडून फसवणूक

मोबाईल ग्राहक सेवा केंद्रांकडून फसवणूक

कोल्हापूर : मोबाईल ग्राहक सेवा केंद्रांकडून ग्राहकांना चांगली वागणूक तर दिली जात नाहीच, शिवाय त्यांची फसवणूकही होत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व मोबाईल कंपन्यांच्या ग्राहक सेवा केंद्रप्रमुखांना बोलावून त्यांची ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आज, गुरुवारी ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.
जिल्ह्यातील मोबाईल विक्रेते विक्रीपश्चात सेवेसाठी ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्राकडे जाण्यास सांगतात. विविध मोबाईल उत्पादकांची कोल्हापुरात सेवा केंद्रे आहेत; परंतु ती ग्राहकांना योग्य वागणूक देत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देऊन सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य असतानाही त्यांच्याकडून ती दिली जात नाही. यामुळे मोबाईलधारक ग्राहकांची फसवणूक होत आहे. याला प्रतिबंध होणे आवश्यक आहे. यासाठी कोल्हापुरातील सर्व मोबाईल कंपन्यांच्या ग्राहक सेवा केंद्रप्रमुखांना बोलावून घेऊन ग्राहक पंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी.
ही केंद्रे मोबाईल सेटमध्ये असणाऱ्या दोषांचे निराकरण करीत नाहीत. मोबाईल सेट ठेवून घेऊन तो वर कंपनीकडे पाठवितो म्हणून सांगितले जाते; परंतु कोणत्याही प्रकारची दुरुस्ती न करता नादुरुस्त असलेला मोबाईल जसाच्या तसा परत दिला जातो. यामुळे ग्राहकाला विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकाला याचा विनाकारण भुर्दंड सहन करावा लागतो.
अशा प्रकारे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. याला आळा बसणे आवश्यक आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेऊन मार्ग काढावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अरुण यादव, शिवनाथ बियाणी, मोहन शेटे, दत्तात्रय धडेल, दत्तात्रय मिटके, अ‍ॅड. ज्योत्स्ना डासाळकर, सम्राट बच्चे, जगन्नाथ जोशी, डॉ. अनिल अनिखिंडी यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Fraud from mobile customer service centers