रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 22:21 IST2026-04-11T22:20:24+5:302026-04-11T22:21:45+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात रानगव्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वन विभागाने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
धामोड: चांदे पैकी पाल खुर्द येथे एका शेतकऱ्यावर रानगव्याने हल्ला केला. त्यात शेतकरी शामराव कोराणे यांचा मृत्यू झाला. रानगव्याने केलेला हल्ला इतका भीषण होता की, त्याची शिंगे छातीत घुसली. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवले. पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
शामराव कोराणे हे शनिवारी (११ एप्रिल) दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या 'काजूचे शेत' नावाच्या शिवारात बागेची राखण करण्यासाठी गेले होते. ते तिथे गस्त घालत होते. मात्र, झाडांच्या झुडपात दबा धरून बसलेल्या एका गव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
शेतकऱ्याच्या छातीत घुसली शिंगे
हा हल्ला इतका भीषण होता की गव्याचे शिंगे थेट शामराव यांच्या छातीत घुसले. गंभीर जखमी शामराव रक्ताच्या थारोळ्यात पडले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शामराव यांना तातडीने कोल्हापूरच्या सीपीआर कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या छातीला झालेली गंभीर इजा आणि मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्त्राव यामुळे त्यांची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती. उपचारादरम्यान शामराव कोराणे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सुन,तीन विवाहीत मुली असा परिवार आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोल्हापूरचे विभागीय वन अधिकारी विशाल पाटील यांनी स्वतः सीपीआर रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी शामराव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. वनविभागाकडून मिळणारी तातडीची मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.