ब्याडगीच्या दरात घसरण, मागणीबरोबर आवकही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 11:09 AM2021-02-01T11:09:04+5:302021-02-01T11:11:22+5:30
Market Kolhapur- ऐन हंगामाच्या तोंडावर मिरचीने चांगलीच उसळी घेतली होती. मात्र या आठवड्यात दरात थोडी घसरण झाली असून किरकोळ बाजारात ब्याडगी २८० रुपयांपर्यंत खाली आली आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. फळमार्केटमध्ये माल्टा, बोरे, कलिंगडांची रेलचेल असून, द्राक्षांची आवक हळूहळू वाढू लागली आहे.
![With the fall in prices, demand has also increased | ब्याडगीच्या दरात घसरण, मागणीबरोबर आवकही वाढली With the fall in prices, demand has also increased | ब्याडगीच्या दरात घसरण, मागणीबरोबर आवकही वाढली](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/31012021-kol-bazar_202102553844.jpg)
ब्याडगीच्या दरात घसरण, मागणीबरोबर आवकही वाढली
कोल्हापूर : ऐन हंगामाच्या तोंडावर मिरचीने चांगलीच उसळी घेतली होती. मात्र या आठवड्यात दरात थोडी घसरण झाली असून किरकोळ बाजारात ब्याडगी २८० रुपयांपर्यंत खाली आली आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. फळमार्केटमध्ये माल्टा, बोरे, कलिंगडांची रेलचेल असून, द्राक्षांची आवक हळूहळू वाढू लागली आहे.
यंदा परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळीच्या झटक्याने मिरचीच्या पिकाला फटका बसला होता. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच मिरचीने ४०० रुपयांचा टप्पा गाठला होता. या आठवड्यात मात्र दरात हळूहळू घसरण होत असून किरकोळ बाजारात ब्याडगीचा दर २८० रुपये किलोपर्यंत आला आहे. येत्या आठ-दहा दिवसांत आवक वाढल्याने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
चटणीसाठी लागणाऱ्या मसाल्याच्या दरात चढउतार नाही. तीळ १५०, जिरे २००, खोबरे १८० रुपये किलो आहे. कोथिंबिरीची मागणी वाढल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याने वांगी, कोबी, टोमॅटोच्या दरांत मोठी घसरण पाहावयास मिळते. किरकोळ बाजारात २० तर कोबी दहा रुपये किलो आहे. टोमॅटोही दहा रुपये किलोपर्यंतच राहिला आहे. दोडका, वाल, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, घेवडा, ढब्बू या भाज्यांचे दर काहीसे स्थिर आहेत.
फळबाजारामध्ये मोसंबी, माल्टा, संत्री, द्राक्षे, चिक्कू, सफरचंदांची रेलचेल पाहावयास मिळते. द्राक्षांची आवक थोडी वाढली असली तरी अद्याप ती हिरवट आहेत. द्राक्षे काहीसी आंबट लागत असल्याने मागणी कमी आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तीस रूपये किलो दर आहे. कलिंगडांची आवक वाढू लागली आहे. काळ्या पाठीच्या कलिंगडांनी बाजार फुलला असून मागणीही चांगली आहे.
डाळींच्या दरात वाढ दिसत नाही. हरभराडाळ ६५, तूरडाळ ११०, मूगडाळ १२०, भूग १००, मटकी १२० रुपये किलो आहे. शाबू ६०, तर साखर ३५ रुपयांवर स्थिर आहे.
कांदा-बटाटा स्थिर
बाजार समितीत रोज १६ हजार पिशव्या कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे दरात वाढ नसून घाऊक बाजारात सरासरी २५ रुपये कांदा आहे. बटाट्याचाही दरदाम स्थिर आहे.