रमेश सुतार
बुबनाळ : शिरोळ तालुक्यात कृष्णा नदी काठलगत माती उत्खनन केल्यामुळे नदीचे पात्र बदलून जमिनी ढासळत आहेत. महसूल कर्मचाराच्या आशीर्वादाने माती परवान्याच्या अनेकपट उत्खनन केल्यामुळे अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे.
शिरोळ तालुक्यात वाळू उपसा बंदीनंतर आता माती उत्खनन मोठ्या प्रमाण वाढले आहे. कृष्णा नदीकाठलगत जेसीबीच्या साह्याने माती उत्खनन केल्यामुळे नदीचे पात्र बदलून जमीन ढासळू लागली आहे.
शिरटी, कनवाड, कुटवाड. शेडशाळ, बस्तवाड येथे अनेक ठिकाणी परवान्याच्या अनेक पटीने माती उत्खनन केल्यामुळे नदीच्या मातीचे काठ ढासळू लागले आहेत. जेसीबीद्वारे नदीपात्रापासून दहा ते पंधरा फुटापर्यंत माती काढल्यामुळे पात्र बदलून पुराचे पाणी अनेक गावात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माती उत्खनन करून बेकायदेशीर सांगली जिल्ह्यात वाहतूक केली जात आहे. मध्यंतरी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या सातबारावर दंडात्मक कारवाई केली. तरीदेखील बेकायदेशीर माती उत्खनन सुरू आहे. याबाबत आंदोलन अकुंशचे धनाजी चुडमुंगे यांनी बेकायदेशीर माती उत्खनाकडे तहसीलदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले हाेते. माती उत्खननात तलाठी, मंडल अधिकारीपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत साखळी कार्यरत असल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे, तर काही शेतकरी पैशाच्या मोबदल्यात 'अति तिथे माती' या प्रमाणे मातीची विक्री करून निसर्गाला आव्हान देत आहेत.
फोटो ओळ - २३ माती
शिरोळ तालुक्यात कृष्णा नदी काठलगत जेसीबीच्या साह्याने माती उत्खनन केल्यामुळे नदीचे पात्र बदलले आहे.