कोल्हापूर : कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते वैभववाडीदरम्यानच्या १०८ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वेमार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. आता या प्रकल्पासाठी राज्य सरकारसह विविध संबंधित घटकांशी सल्लामसलत केली जाणार आहे. त्यानंतर नीती आयोग आणि अर्थ मंत्रालय यांच्याकडून आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण होईल. या सर्व प्रक्रियांमुळे प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी सध्या निश्चित करता येणार नसल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे स्पष्ट केले आहे.कोल्हापूरमधील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून एकूण ३० रेल्वेगाड्या धावतात. या गाड्यांमुळे कोल्हापूरला दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध आहे. यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, हरिप्रिया एक्सप्रेस आदी महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.प्रकल्पासाठी या बाबी महत्त्वाच्या- जमिनीचे संपादन- वनविभागाची परवानगी- अडथळा निर्माण करणाऱ्या सेवा सुविधांचे स्थलांतर- विविध प्राधिकरणांकडून कायदेशीर मंजुरी- भौगोलिक व भूपृष्ठीय परिस्थिती- कायदा व सुव्यवस्था- कामासाठी उपलब्ध कालावधी- प्रवासी व मालवाहतुकीचा अंदाज- आर्थिक व्यवहार्यता- संपर्क सुविधा, मार्गातील दुवे- राज्य सरकार व लोकप्रतिनिधींच्या मागण्या- सामाजिक-आर्थिक गरजा- निधीची उपलब्धता
कोल्हापूर-वैभववाडी १०८ कि.मी नवीन रेल्वेमार्गाचा डीपीआर तयार, पुढील टप्प्यातील मंजुरी प्रक्रिया लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:02 IST