कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:01+5:302021-02-05T06:56:01+5:30
विद्यार्थी आणि त्यांच्या संघटनांकडून गेल्या तीन महिन्यांपासून महाविद्यालये सुरू करण्याबाबत वारंवार मागणी झाली. त्यावर विद्यापीठाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. ...

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना दिलासा
विद्यार्थी आणि त्यांच्या संघटनांकडून गेल्या तीन महिन्यांपासून महाविद्यालये सुरू करण्याबाबत वारंवार मागणी झाली. त्यावर विद्यापीठाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्याबाबतच्या कार्यवाहीसाठी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांचा समावेश असणारी समिती गठीत केली. ही समिती शासन आदेशानुसार महाविद्यालये सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे. ही तत्त्वे, शासन आदेश विद्यापीठ विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषद या अधिकार मंडळांसमोर ठेवून त्यांची मान्यता घेऊन महाविद्यालये आणि विद्यापीठातील अधिविभागांमधील वर्ग भरविण्यात येणार आहेत. दरम्यान, योग्य ती प्रक्रिया राबवून आणि शासन आदेशाचे पालन करून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वर्ग भरविण्यात येतील. अधिकार मंडळांच्या मान्यतेची प्रक्रिया दि. १० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केली जाईल, असे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले.
चौकट
दुसऱ्या टप्प्यात वसतिगृहे सुरू करणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्ष आणि कोविड केअर सेंटरसाठी शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातील एक वसतिगृह आणि मुलांचे वसतिगृह क्रमांक एक, दोन आणि तीन जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात गेल्या अकरा महिन्यांपासून होती. ही वसतिगृहे प्रशासनाने विद्यापीठाच्या ताब्यात दिली आहेत. त्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. या वसतिगृहाचे निर्जंतुकीकरण करून महाविद्यालये सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी अखेरीस वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी सुरू केली जातील, असे डॉ. शिर्के यांनी सांगितले.
आकडेवारी दृष्टिक्षेप
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये : २९३
एकूण विद्यार्थी : २५६२४२
मुले : १२७४२८
मुली : १२१६६७