जिल्ह्यात भाजपची अवस्था दयनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:12+5:302021-01-21T04:22:12+5:30
ए. वाय. पाटील यांंची टीका : जनतेच्या भ्रमनिरासाचे भाजपला फळ लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात भाजपची ...

जिल्ह्यात भाजपची अवस्था दयनीय
ए. वाय. पाटील यांंची टीका : जनतेच्या भ्रमनिरासाचे भाजपला फळ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात भाजपची अवस्था दयनीय झाली असून आगामी काळात भाजपची अवस्था दुर्बिणीतून शोधण्याची वेळ येईल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पत्रकातून केली.
सत्तेच्या काळात भाजपच्या नेत्यांनी कोल्हापूरसाठी काय केले? जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या पाण्यापैकी एक थेंबही अडवता आला नाही, रस्त्यांची तर दुरवस्था सुधारता आली नाही. सामान्य माणसाचा तर भ्रमनिरास भाजप सरकारने केल्याने त्याचे फळ ग्रामपंचायत निवडणुकीत मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीने १५८ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवत १,४४६ सदस्य निवडून आणले आहेत. शिवसेना व काँग्रेस पक्षानेही घवघवीत यश मिळवले आहे. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकीतील महाविकास आघाडीची कामगिरी ६० टक्केपेक्षा अधिक असून भाजप २० टक्केपेक्षा कमी राहिला आहे. तरीही भाजप जिल्हाध्यक्ष ‘मै गिरा तो भी टांग उपर’ या पद्धतीने विधान करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच १९ जानेवारी रोजी जिल्हाध्यक्षांचा वाढदिवस असल्याने, निवडणूक निकालाबाबत त्यांच्यावर टीका करू नका, असा सल्ला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. वाढदिवसादिवशी कोणालाही दुःख, यातना, वेदना होऊ नयेत, ही त्यांची भावना होती.
भाजपने बाता करू नयेत
शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पंधरा गावात एकाही ठिकाणी भाजपला सत्ता आणता आली नाही. पूर्वी राजे गटाचे प्रभावक्षेत्र असलेल्य गावात दयनीय अवस्था झाली असताना, भाजपने विजयाच्या बाता करू नयेत, असा पलटवार ए. वाय. पाटील यांनी केला.