अजितदादांचे सडोली खालसाच्या माळावर कोल्हापुरातील अखेरचे भाषण, आठवणीने कार्यकर्ते गहिवरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:06 IST2026-01-29T12:05:58+5:302026-01-29T12:06:46+5:30
Ajit Pawar Death in Plane Crash: सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या प्रचार सभांसाठी जानेवारीमध्ये ते अल्पकाळासाठी कोल्हापूर विमानतळावर आले होते.

अजितदादांचे सडोली खालसाच्या माळावर कोल्हापुरातील अखेरचे भाषण, आठवणीने कार्यकर्ते गहिवरले
कोल्हापूर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापुरातील शेवटचा मेळावा सडोली खालसा (ता. करवीर) येथे २५ ऑगस्ट २०२५ रोजी झाला होता. काॅंग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष प्रवेश समारंभाला ते आले होते. मेळाव्यात त्यांनी केलेल्या तडाखेबंद भाषणाच्या आठवणीने कार्यकर्ते गहिवरले.
अजित पवार हे वारंवार कोल्हापूरला यायचे. कोल्हापुरात आले की दोन-तीन मेळावे घेतल्याशिवाय ते जात नव्हते. विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या सव्वा वर्षात पक्षाबरोबरच शासनातील जबाबदारीमुळे त्यांचे कोल्हापूरचे दौरे थोडे कमी झाले होते. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या गटाने राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल पाटील व राजेश पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी ऑगस्ट महिन्यात ते कोल्हापुरात आले होते.
वाचा: कोल्हापूकरांच्या अडचणीला धावणारे 'दादा'; महापूर, कोरोना काळात दिला आधार
सडोली खालसा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर त्यांची सभा झाली होती. तिथे त्यांनी तडाखेबंद भाषण केले होते. त्या भाषणाच्या आठवणीने पक्षाचे कार्यकर्ते गहिवरले.
त्यानंतर महापालिका निवडणुकीत त्यांची एकही सभा कोल्हापुरात झाली नाही. पण, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या प्रचार सभांसाठी जानेवारीमध्ये ते अल्पकाळासाठी कोल्हापूर विमानतळावर आले होते.