रस्त्यांचे ढिसाळ काम करणाऱ्या ठेकेदारांची बिले रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST2021-08-27T04:20:15+5:302021-08-27T04:20:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, मनपाकडून तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्तीची कामे केली जात ...

Stopped the bills of the contractors who were doing the sloppy work of the roads | रस्त्यांचे ढिसाळ काम करणाऱ्या ठेकेदारांची बिले रोखली

रस्त्यांचे ढिसाळ काम करणाऱ्या ठेकेदारांची बिले रोखली

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, मनपाकडून तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्तीची कामे केली जात आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर मनपाकडून जी दुरुस्ती करण्यात आली होती त्यापैकी अनेक रस्त्यांचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले होते. याबाबत मनपा प्रशासनाने नेमलेल्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, रस्त्यांची दुरुस्ती ही तकलादू स्वरुपाची असल्याचे आढळून आल्यानंतर दोन ठेकेदारांची बिले मनपाकडून रोखण्यात आली आहेत.

मनपा प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना या रस्त्यांची पुन्हा नव्याने दुरुस्ती करण्याचा सूचना दिल्या आहेत. महापालिकेकडून ९ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून, शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, त्यापैकी ४ ते ५ कोटी रुपयांच्या निधीतून कामे झाल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे. त्यात ज्या ठिकाणी दुरुस्तीची कामे झाली आहेत. त्या ठिकाणची कामेदेखील तकलादू स्वरुपातील आहेत. त्यामुळे मनपाचा ९ कोटींचा निधी अक्षरश: पाण्यातच गेल्याचे दिसून येत आहे.

या ठेकेदारांची रोखण्यात आली बिले

१. सुशील डोंगरे

२. राजकिरण चौधरी

३. मनपाकडून काही ठेकेदारांच्या बिलांचे प्रस्तावदेखील लेखा विभागाकडे पाठविण्यात आलेले नाहीत.

मनपा करणार रस्त्यांचे ऑडिट

मनपाकडून लवकरच शहरातील दुरुस्ती कामांचे ऑडिट करण्यात येणार आहे. हे ऑडिटचे काम एका त्रयस्थ संस्थेला दिले जाणार आहे. तसेच यासाठी मनपातील काही अधिकारीदेखील नेमण्यात येणार आहेत. ऑडिटनंतर ज्या मक्तेदारांचे काम दर्जाहीन आढळून येणार अशा ठेकेदारांसह मनपा अभियंत्यांवरदेखील कठोर कारवाई करण्याचे संकेत मनपा प्रशासनाने दिले आहेत. शहरातील कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही मनपाकडून सांगण्यात आले.

९ कोटींच्या कामांचे काय ?

शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाने प्रभागनिहाय प्रत्येकी ५० लाख रुपयांप्रमाणे ९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. मात्र, त्यापैकी ४ ते ५ कोटींच्या निधीतून दुरुस्ती झाल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र रस्त्यांवर कामेच झालेली दिसून येत नाहीत. तसेच आता या कामांची मुदतदेखील संपली आहे. त्यामुळे मुदतीत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर मनपा प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

कोट...

काही कामांबाबत मनपा अधिकाऱ्यांनी गुणवत्ता नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे तीन अभियंत्यांची बिलांची रक्कम रोखण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी कामांची गुणवत्ता चांगली नाही अशा ठिकाणी पुन्हा नव्याने कामे करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

-अरविंद भोसले, शहर अभियंता, मनपा

Web Title: Stopped the bills of the contractors who were doing the sloppy work of the roads