“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:46 IST2026-04-03T13:46:15+5:302026-04-03T13:46:59+5:30
Sanjay Raut News: राहुरीमध्ये लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण भाजपाला मदत होईल, अशी भूमिका कुणी घेऊ नये, असा महाविकास आघाडीचा निर्णय आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
Sanjay Raut News: अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, सरकारने आणि पालकमंत्र्यांनी तातडीने संवेदना व्यक्त केल्या पाहिजे. मात्र तसे दिसत नाही, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, मात्र तशी सरकार पावले उचलत असल्याचे दिसत नाही, सरकार असंवेदनशील आहे. चोवीस तास राजकारण करणारे कुठे आहेत. संकट मोचक गिरीश महाजन, ते केवळ राजकीय संकट मोचक आहेत का? शेतकऱ्यांच्या वेळी कुठे आहेत, आमदार पळविणे हेच काम संकट मोचकाच आहे का, असा रोखठोक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. पोलिसांनी योग्य तपास केला आहे, संदीप कर्णिक यांच्यामुळे अशोक खरात लंगडताना दिसला, गृहखाते काय तपास करते, त्यात कोणाला सोडले, अडकवले यावर बोलता येईल, एसआयटी उत्तम काम करत आहे. या प्रकरणात सुषमा अंधारे आणि रोहित पवार यांच्यामध्ये असलेल्या माहितीमध्ये तफावत आहे, माझ्याजवळ अधिक माहिती नसल्याने मी याबाबत बोलू इच्छित नाही, आसाराम बापू मुक्त आहेत, राम रहीम मुक्त आहे, निवडणुकीसाठी त्याला बाहेर आणले गेले होते, अशा सरकारकडून काय अपेक्षा करणार, अशी टीका संजय राऊतांनी केली.
बारामती-राहुरीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील
राहुरी आणि बारामतीमध्ये आता पोटनिवडणूक होत आहे. आमचा प्रयत्न आहे की, या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये या आधीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांनी चांगल्या पद्धतीने लढवली होती. आता मला नक्की माहिती नाही पण, त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद असल्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांना बसून निर्णय घ्यावा लागेल, असे संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक धर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही. पण त्या ठिकाणी जर कोणी इतर लढत असतील तर त्यांना आपण विरोध करता कामा नये. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागांसंदर्भात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते बसून निर्णय घेतील आणि तो घ्यावा लागेल. राहुरीमध्ये लढण्याची आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण भाजपाला मदत होईल, अशी भूमिका कुणी घेऊ नये, असा महाविकास आघाडीचा निर्णय आहे, असेही राऊत म्हणाले.