पावसाच्या दडीने भाजीपाल्याची आवक वाढली, भावातही घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST2021-07-12T04:11:52+5:302021-07-12T04:11:52+5:30

विजयकुमार सैतवाल जळगाव : पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली असताना पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव कमी झाले ...

The rains brought in more vegetables and reduced prices | पावसाच्या दडीने भाजीपाल्याची आवक वाढली, भावातही घसरण

पावसाच्या दडीने भाजीपाल्याची आवक वाढली, भावातही घसरण

विजयकुमार सैतवाल

जळगाव : पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली असताना पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव कमी झाले आहे. पत्ता कोबी वगळता जवळपास सर्वच भाज्यांचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता पावसाळा असल्याने जोरदार पाऊस झाल्यानंतर आवक कमी होऊन भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे. किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहे.

सर्वच भाजीपाल्याची आवक चांगली असून भाव कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. खाद्यतेलाचादेखील सध्या दिलासा असून गेल्या काही महिन्यांपासून भाव खाणाऱ्या खाद्यतेलाचे भाव कमी होत आहे. यामध्ये सोयाबीन तेल १४६, शेंगदाणा तेल १७०, सूर्यफूल तेल १५५, पाम तेल १२६० रुपये प्रति किलोवर आहे. तीळ तेल मात्र २०० रुपये प्रति किलोवर कायम आहे. तेलाचे भाव कमी होण्यासह इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहेत.

मागणीअभावी भाव स्थिर

सध्या निर्बंधामुळे दुकानांना दुपारी ४ वाजेपर्यंतच परवानगी असल्याने ग्राहकी कमी झाली आहे. यामुळे मागणीवरही परिणाम होऊन सर्वच किराणा मालाचे भाव स्थिर आहेत. बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये, तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहे.

मेथीच्या भावात मोठी घसरण

पावसाचा हिरव्या पालेभाज्यांवर मोठा परिणाम होत असतो. मात्र सध्या पाऊस नसल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांची चांगली असल्याने त्यांचे भाव घसरले आहे. यामध्ये ७० ते ८० रुपयांवर असलेली मेथी सध्या ५० रुपये प्रति किलोवर आली आहे. कोथिंबीरचे भावदेखील ३० ते ४० रुपये प्रति किलोवर तर पालक ३० रुपये प्रति किलोवर आला आहे.

लिंबूचे भाव निम्म्यावर

गेल्या काही दिवसांपासून ५० ते ६० रुपयांवर असलेल्या लिंबूचे भाव सध्या ३० रुपये प्रति किलोवर आले आहेत. यासोबतच बटाट्याचे भाव २० रुपये प्रति किलो तर कांद्याचे भाव अजूनही ३० रुपये प्रति किलोवर आहे. लसूण १०० ते १४० रुपयांवर आहे.

पाऊस नसल्याने सर्वांना चिंता असली तरी भाजीपाल्याचे भाव कमी झाले आहे. त्यामुळे दिलासा आहे. खाद्यतेलाचेही भाव कमी होत असल्याने काहीसा भार कमी झाला आहे.

- मनोहर पवार, ग्राहक

खाद्यतेलाचे भाव कमी होत असून इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे. सध्या ग्राहकी कमी असल्याने मागणी कमी होऊन हा परिणाम होत आहे.

- सुरेश वाणी, व्यापारी

सध्या पावसाने उघडीप दिल्याने भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे त्यांचे भाव कमी झाले आहेत.

- नीलेश भोळे, भाजीपाला विक्रेते

Web Title: The rains brought in more vegetables and reduced prices