१०० फूट फरफटत नेली गाडी; ज्या समृद्धी महामार्गाला जमीन दिली, त्याच मार्गाने घेतला बळी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 18:27 IST2026-04-02T18:26:40+5:302026-04-02T18:27:09+5:30
फुटलेल्या बांगड्यांचा सडा आणि रक्ताने माखलेले डबे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

१०० फूट फरफटत नेली गाडी; ज्या समृद्धी महामार्गाला जमीन दिली, त्याच मार्गाने घेतला बळी!
बदनापूर : तालुक्यातील केळीगव्हाण येथील एका कुटुंबाने समृद्धी महामार्गासाठी जमीन दिली असून, या जमीन देणाऱ्या कुटुंबातील महिलेचा समृद्धीने बळी घेतला आहे. समृद्धी महामार्गावर बुधवारी झालेल्या अपघातातमृत्यू पावलेल्या येथील मजुरी करणाऱ्या महिला व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.
तालुक्यातील केळीगव्हाण येथील कडूबाई रामदास मदन यांचे समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात निधन झाले. या महामार्गासाठी त्यांची दहा गुंठे व त्यांच्या दिराची ५० गुंठे जमीन दिली आहे. आता याच महामार्गावर गवत काढणे व इतर साफसफाईची कामे करण्यासाठी कडूबाई रोजंदारीने कामावर जात होत्या. मात्र, याच समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये त्यांचा जीव गेला आहे. अपघातामध्ये त्यांची सून रेवती योगेश मदन या जखमी झाल्या आहेत. कडूबाई रामदास मदन यांना पती व दोन मुले आहेत. त्यांना केवळ एक एकर शेती असून, त्यांचे पती शेतमजुरीचे व एक मुलगा गावात पाणीपुरीची हातगाडी लावून छोटासा व्यवसाय करतो. दुसरा मुलगा एका कंपनीत कामाला जातो. त्यांच्या अचानक जाण्यामुळे या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
या अपघातात मयत झालेल्या लक्ष्मीबाई संतोष मदन यांच्या पश्चात पती व दोन मुले आहेत. त्यांची शेती तलावात संपादित झाल्यामुळे त्यांना शेती नाही. त्यांची दोन्ही मुले शिक्षण घेत असून, त्यांचा एक मुलगा आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहे. मुलांचा शिक्षणाचा खर्च व कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी पती- पत्नीला मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यांचे पती जालना येथे एका हॉटेलमध्ये मजुरीकाम करतात. त्या समृद्धी महामार्गावर रोजमजुरी करून उदरनिर्वाह करीत होत्या. त्यांच्या अचानक निधनामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या अपघातात मयत झालेल्या ताराबाई गहिनाजी चौधरी यांच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असून, या अपघातामध्ये त्यांची सून कविता विठ्ठल चौधरी यासुद्धा जखमी झाल्या आहेत. त्यांचे पती शेतीकाम करतात. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
पिकअप १०० फूट फरफटत नेले
भरधाव कंटेनरने जोराची धडक देत पिकअपला जवळपास १०० फूट फरफटत नेले. त्यामुळे आत बसलेल्या सहा महिलांचा जागीच, तर दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
डबा, कपडे पाहून नागरिक गहिवरले
अपघातस्थळी महिलांचे कपडे, चपलांसह इतर साहित्य पडले होते. शिवाय फुटलेल्या बांगड्यांचा सडा समृद्धी महामार्गावर पडला होता. हे सर्व साहित्य पाहून अपघातस्थळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकही गहिवरले होते.