जालन्यात पावसाचे थैमान सुरूच; २४ तासांत १७ मंडळांत अतिवृष्टी, नदी-नाले दुथडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 19:50 IST2025-05-29T19:49:55+5:302025-05-29T19:50:25+5:30
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी वाढले आहे. त्याशिवाय दुधना, परतूर तालुक्यातून वाहणाऱ्या गौतमी नदीसह इतर नद्या दुथडी वाहत आहेत.

जालन्यात पावसाचे थैमान सुरूच; २४ तासांत १७ मंडळांत अतिवृष्टी, नदी-नाले दुथडी
जालना : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान सुरू आहे. गत २४ तासांत जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी १७ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. परतूर तालुक्यातील परतूर आणि श्रीष्टी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून, या दोन्ही मंडळांत प्रत्येकी तब्बल १०२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी वाढले आहे. त्याशिवाय दुधना, परतूर तालुक्यातून वाहणाऱ्या गौतमी नदीसह इतर नद्या दुथडी वाहत आहेत. सतत होणाऱ्या पावसामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पाहणी केली असून, नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
गौतमी नदीवर पूल होईना
परतूर तालुक्यातील सावरगाव (बु.) शिवारातून वाहणाऱ्या गौतमी नदीलाही पूर आला होता. या नदीवरील पुलाचे काम अनेक वर्षांपासून झालेले नाही. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंनी दोरी बांधून नागरिकांना धोकादायक स्थितीत पूल पार करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या मागणीकडे लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे.
कोणत्या मंडळात अतिवृष्टी
जालना तालुक्यातील जालना शहर ६६.३ मिमी, जालना ग्रामीण ६६.३ मिमी, परतूर तालुक्यातील परतूर १०२.३ मिमी, वाटूर ६५.५ मिमी, आष्टी ६६.५ मिमी, श्रीष्टी १०२.३ मिमी पाऊस झाला. बदनापूर तालुक्यातील बदनापूर मंडळात ६५.५ मिमी, शेलगाव ६९.५ मिमी, बावणे पांगरी ६८.८ मिमी, रोशनगाव ६५.५ मिमी पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव मंडळात ७७ मिमी, तीर्थपुरी ६९.८ मिमी, कुंभार पिंपळगाव ६९.८ मिमी, अंतरवाली ६९.८ मिमी, रांजणी ७९.५ मिमी, जांबसमर्थ ६६.५ मिमी पाऊस झाला. मंठा तालुक्यातील मंठा मंडळात ७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.