"विखे पाटील, सहनशीलता संपू देऊ नका!" मराठा आरक्षणावरून जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:59 IST2026-02-25T18:57:52+5:302026-02-25T18:59:13+5:30
मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास पुन्हा उपोषणाचे हत्यार

"विखे पाटील, सहनशीलता संपू देऊ नका!" मराठा आरक्षणावरून जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा!
वडीगोद्री (जालना): "हैदराबाद गॅझेटच्या जीआरनुसार मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले नाही, तर मला पुन्हा उपोषणाला बसावे लागेल," असा सडेतोड इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. बुधवारी अंकुशनगर (महाकाळा) येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकार आणि विशेषतः मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
विखे पाटलांना विचारला जाब
जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे, त्यांनी हा शब्द खोटा ठरू देऊ नये. "विखे पाटील, तुम्ही सातारा संस्थानच्या गॅझेटियरचा जीआर कधी काढणार? आम्ही सहा महिने वाट पाहिली आहे, आता माझी सहनशीलता संपू देऊ नका," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच, मराठा समाजावरील गुन्हे अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत, याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्ह्यांची मागणी
जरांगे यांनी सरकारकडे एका विशेष परिपत्रकाची मागणी केली आहे. "ज्या अधिकाऱ्यांकडे हैदराबाद गॅझेटियरनुसार अर्ज येईल, त्यांनी तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावे. यात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होतील, असा उल्लेख परिपत्रकात असावा," असे त्यांनी सुचवले.
भाजपला २०२९ चा इशारा
सरकारला इशारा देताना जरांगे म्हणाले की, भाजपने मराठ्यांच्या जीवावर सत्ता मिळवली आहे, पण आता तेच मराठ्यांच्या विरोधकांचे ऐकत आहेत. "मी जून महिन्यात उपोषणाला बसलो तर एकाही मंत्र्याला जवळ येऊ देणार नाही. वेळ पडली तर मराठा समाज उपोषण करत मुंबईत धडकेल. २०२९ च्या निवडणुकीत मराठे तुम्हाला पाडून टाकतील, हे लक्षात ठेवा," असा गर्भित इशारा त्यांनी भाजप नेत्यांना दिला.