शेतीच्या बांधावरून वाद; भावकीच्या हल्ल्यात पित्याचे संरक्षण करताना मुलाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:02 IST2025-06-30T20:01:37+5:302025-06-30T20:02:13+5:30
शेतातील सामाईक बांधावर पावसाचे पाणी वाहण्यासाठी चारी खोदली अन् वादाची ठिणगी पडली

शेतीच्या बांधावरून वाद; भावकीच्या हल्ल्यात पित्याचे संरक्षण करताना मुलाचा जागीच मृत्यू
- अझहर शेख
वाढोणा ( जि. जालना): वाढोणा शिवारातील गट क्रमांक 119 मधील शेतजमिनीच्या बांधावरून निर्माण झालेल्या वादातून एका 24 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजता घडली. भावकीच्या हल्ल्यात मुलाने वडिलांचे संरक्षण केले पण स्वतःचा जीव गमावल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
तक्रारदार गणेश तुळशीदास तनपुरे (वय 60) हे आपल्या शेतात मुलगा किरण तनपुरे याच्यासोबत काम करत असताना, चुलत भाऊ परमेश्वर गुलाबराव तनपुरे व त्याचा मुलगा किशोर परमेश्वर तनपुरे यांनी शेतातील सामाईक बांधावर पावसाचे पाणी वाहण्यासाठी चारी खोदली. यावरून वाद निर्माण झाला.
गणेश तनपुरे यांनी याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी शिवीगाळ करत त्यांच्या मारहाणीचा प्रकार केला. त्यावेळी किरण तनपुरे यांनी मध्यस्थी करत वडिलांचे संरक्षण केले. मात्र, याच क्षणी आरोपींनी दगडाने त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार हल्ला करत त्याला जागीच ठार मारले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेची नोंद परतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा म्हणून करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तत्पूर्वी दोन तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे, उपनिरीक्षक अमोल रावते, विठ्ठल केंद्रे, भिमराव मुंढे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.