बालसभेतून होतोय विद्यार्थ्यांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:08 IST2019-06-17T00:07:48+5:302019-06-17T00:08:14+5:30
शिक्षक- पालकांच्या प्रयत्नातून राबविलेले उपक्रम यशस्वी होतात, याची प्रचीती तालुक्यातील गुंडेवाडी जिल्हा परिषद शाळेकडे पाहिल्यानंतर येते

बालसभेतून होतोय विद्यार्थ्यांचा विकास
विष्णू वाकडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिक्षक- पालकांच्या प्रयत्नातून राबविलेले उपक्रम यशस्वी होतात, याची प्रचीती तालुक्यातील गुंडेवाडी जिल्हा परिषद शाळेकडे पाहिल्यानंतर येते. विशेषत: शाळेत सुरू असलेल्या बालसभेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून, त्यांच्या सामाजिक जाणीवाही प्रगल्भ होत आहेत.
जालना शहरापासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर गुंडेवाडी हे गाव वसलेले आहे. १९५६ साली येथे जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली आणि विद्यार्थ्यांना गावातच शिक्षणाची दारे खुली झाली.
दहा वर्षापूर्वी क्रमश: पाचवी ते सातवी पर्यंतच्या वर्गांना नव्याने मान्यता मिळाली. तत्कालीन ग्राम शिक्षण समितीने गावाशेजारी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी शाळेची सुसज्ज इमारत उभी केली. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या शाळेत सद्यस्थितीत १५२ मुले- मुली शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासन, प्रशासनस्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, या उपक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमही शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी राबविले आहेत. विशेषत: हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी पालकही सतत पुढाकार घेतात.
जिल्हा परिषद शाळेतील समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थही आग्रेसर असतात. शिक्षक, पालकांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाºया बालसभा, सांस्कृतिक कार्यक्रम, डिजिटल क्लास आदी विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत असून, त्यांच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ होत आहे. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प शिक्षक, पालकांनी केला
आहे.