"शेतकऱ्याला पक्ष नसतो रे!" जेव्हा भर बैठकीत अजितदादांनी आपल्याच कार्यकर्त्यांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 13:05 IST2026-01-29T13:04:43+5:302026-01-29T13:05:33+5:30
Ajit Pawar Death: गावातील राजकीय मतभेदामुळे तक्रार करणारे पदाधिकारी म्हणाले की, ते भाजपचे शेतकरी आहेत. दादांनी त्यांना फटकारले व म्हणाले की धरणातील पाणी संपले. त्यात ते पेरणी करतात, त्यात तुमचे काय जाते?

"शेतकऱ्याला पक्ष नसतो रे!" जेव्हा भर बैठकीत अजितदादांनी आपल्याच कार्यकर्त्यांना सुनावलं
जालना : जालन्याच्या राजकारणावर अजित पवार यांचा प्रभाव नेहमीच राहिलेला आहे. कधी निवडणुकीतील प्रचारासाठी तर कधी विविध कार्यक्रमानिमित्त अजित पवार जालन्यात येत. त्यांच्याकडे एखाद्याने विरोधी पक्षाच्या माणसांबद्दल तक्रार केली आणि ती तक्रार अयोग्य असेल तर स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही ते फैलावर घेत.
भास्कर आंबेकर जालन्याचे नगराध्यक्ष असताना ते राज्याचे पाणीपुरवठा खात्याचे मंत्री होते. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता अंबेकर जालना शहराच्या पाणीप्रश्नाचे निवेदन घेऊन संभाजीनगरला सुभेदारी विश्रामगृहावर त्यांना भेटायला गेलो. तिथे बैठक चालू होती. बैठक संपल्यावर अजितदादा पवार व राजेश टोपे बाहेर पडले. राजेश टोपे यांनी आंबेकरांना कक्षात नेले. तेव्हा तिथे पाच-सहा अंबड तालुक्यातील कार्यकर्तेही कक्षात आले. त्यांनी अजितदादा यांच्याकडे तक्रार करीत म्हटले की, दादा गल्हाटी धरणात शेती संपादन झाल्यावरही अनेक शेतकरी पिकं काढतात. अजितदादांनी त्याच्याकडे बघून म्हटले, काढू दे ना मग तुमच्या काय बापाचं जातं? असा प्रश्न केला. त्यावर गावातील राजकीय मतभेदामुळे तक्रार करणारे पदाधिकारी म्हणाले की, ते भाजपचे शेतकरी आहेत. दादांनी त्यांना फटकारले व म्हणाले की धरणातील पाणी संपले. त्यात ते पेरणी करतात, त्यात तुमचे काय जाते? असे फटकारून त्यांना सांगितले की, शेतकऱ्याला कोणताही पक्ष नसतो. पक्षाचा विचार केवळ निवडणुकीपुरता नंतर सर्वांनाच मदत करायची भूमिका ते सातत्याने घेत.
आंबेकरांनी निवेदन दिल्यानंतर आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण मदत करत नाही, असा आरोप त्यांनी केला. परंतु, आंबेकरांनी बाजू मांडताच तिथेच पुढील आठवड्यात पाणीप्रश्नासंबंधी मंत्रालयात बैठक घेण्याची सूचना त्यांनी केली आणि प्रत्यक्षात त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीस अंबेकर व आ.अर्जुन खोतकर हजर होते. त्याच बैठकीत पाणीपुरवठा योजनेसंबंधी पुढील आदेश दिलेसुद्धा. तेव्हा त्यांनी मी शिवसेनेचा किंवा इतर कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष आहे, असा जराही विचारही मनात आणला नाही, असा अनुभव शिंदेसेनेचे संपर्कप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितला.