नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या कैद्यांचा भारतात घुसण्याचा प्रयत्न; एसएसबीने ३५ कैद्यांना पकडले; संख्या वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:07 IST2025-09-11T13:01:56+5:302025-09-11T13:07:51+5:30
नेपाळमध्ये आंदोलनादरम्यान तुरुंगातून पळून गेलेल्या ३५ कैद्यांना सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी ताब्यात घेतलं आहे.

नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या कैद्यांचा भारतात घुसण्याचा प्रयत्न; एसएसबीने ३५ कैद्यांना पकडले; संख्या वाढण्याची शक्यता
Nepal Jail Break:नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात तिथल्या विविध तुरुंगातून ७००० कैदी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुरुंगातून पळालेले कैदी नेपाळ तसेच भारतासाठीही एक मोठा धोका मानले जा आहेत. नेपाळ तुरुंगाच्या भिंतींवरून पळून गेलेल्या या कैद्यांपैकी अनेक कैद्यांची भारत-नेपाळ सीमेवर दिसून आले आहेत. त्यामुळे सीमेवर तैनात असलेल्या सशस्त्र सीमा दलाकडून सतर्कता बाळगली जात असून नेपाळमधल्या कैद्यांशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे. सीमा सुरक्षा दलाने आतापर्यंत नेपाळमधून पळालेल्या ३५ कैद्यांना ताब्यात घेतलं असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
भारत-नेपाळ सीमेवरील नेपाळ तुरुंगातून पळून गेलेल्या ३५ कैद्यांना पकडण्यात सशस्त्र सीमा दलाने यश मिळवले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापैकी २२ कैद्यांना उत्तर प्रदेशात, १० बिहारमध्ये आणि तीन पश्चिम बंगालमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामध्ये नेपाळमध्ये तुरुंग फोडून कैदी पळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. नेपाळमधून पळून जाणाऱ्या आणि पकडल्या जाणाऱ्या कैद्यांची संख्या अजूनही वाढत आहे. सध्या सीमेवर देखरेख आणि दक्षता वाढवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, मंगळवारी रात्री बांके येथील बैजनाथ ग्रामीण नगरपालिका-३ मधील नौबस्ता प्रादेशिक कारागृहातील नौबस्ता सुधारगृहात सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या चकमकीत पाच बाल कैद्यांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. या घटनेदरम्यान तुरुंगातील ५८५ कैद्यांपैकी १४९ आणि बालसुधारगृहातील १७६ कैद्यांपैकी ७६ कैदी पळून गेले.दिल्लीबाजार तुरुंगातून १,१००, चितवनमधून ७००, नख्खूमधून १,२००, सुनसरीचा झुंपकातून १,५७५, कांचनपूरमधून ४५०, कैलालीतून ६१२, जलेश्वरतून ५७६, कास्कीमधून ७७३, डांगमधून १२४, जुमलामधून ३६, सोलुखुंबूमधून ८६, गौरमधून २६० आणि बझांग तुरुंगातून ६५ कैदी पळाले आहेत.