पाकिस्तान 'शांतीदूत' बनू पाहतोय...! तिकडे तालिबानने उडवल्या पाकिस्तानच्या ३ लष्करी चौक्या; सीमेवर भीषण संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:30 IST2026-03-26T12:30:24+5:302026-03-26T12:30:39+5:30
Pakistan Taliban Conflict: पाकिस्तानची इराण युद्धात मध्यस्थीची खेळी फसली. तालिबानने पाकिस्तानच्या ३ लष्करी चौक्या उद्ध्वस्त केल्या. ड्युरंड लाईनवर वाढला तणाव.

पाकिस्तान 'शांतीदूत' बनू पाहतोय...! तिकडे तालिबानने उडवल्या पाकिस्तानच्या ३ लष्करी चौक्या; सीमेवर भीषण संघर्ष
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धात मध्यस्थी करून जागतिक स्तरावर चमकोगिरी करण्याचे पाकिस्तानचे स्वप्न असताना तालिबाननेपाकिस्तान सीमेवर धुळधान उडविली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हे इराणशी शांततेची चर्चा करत असतानाच, अफगाणिस्तानच्यातालिबान सरकारने पाकिस्तानी सीमेवर मोठा हल्ला चढवून ३ लष्करी चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
पाकिस्तानला वाटले होते की, सौदी अरब आणि अमेरिकेशी असलेल्या जवळिकीचा वापर करून ते इराण युद्धात महत्त्वाची भूमिका बजावतील. यातून आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारेल आणि कदाचित आर्थिक मदतही मिळेल. मात्र, इराणने पाकिस्तानकडून आलेला युद्धबंदीचा प्रस्ताव धुडकावला आहे. अशातच तालिबानने केलेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान स्वतःची सीमा सुरक्षित ठेवण्यातही अपयशी ठरत असल्याचे जगासमोर आले आहे.
तालिबानने का केला हल्ला?
तालिबानचा असा आरोप आहे की, पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून हल्ले केले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्करी चौक्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक सैनिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानने याला 'दहशतवादी घुसखोरी' म्हटले आहे.
TTP आणि जुना वाद
पाकिस्तान आणि तालिबानमधील तणावाचे मुख्य कारण 'टीटीपी' ही संघटना आहे. हे दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये आश्रय घेऊन पाकिस्तानात हल्ले करतात, असा पाकिस्तानचा आरोप आहे. यामुळेच पाकिस्तानने अफगाणिस्तानात 'एअर स्ट्राईक' केले होते, ज्याचा बदला आता तालिबान घेत आहे.
भारतासाठी चिंतेची बाब?
पाकिस्तानची ढासळती सुरक्षा व्यवस्था आणि तालिबानच्या वाढत्या आक्रमक हालचाली भारतासाठीही महत्त्वाच्या आहेत. शेजारील देशांमधील ही अस्थिरता प्रादेशिक सुरक्षेवर परिणाम करू शकते, ज्यावर भारतीय संरक्षण यंत्रणांचे बारीक लक्ष आहे.