Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:06 IST2025-06-20T19:05:51+5:302025-06-20T19:06:28+5:30
इराणने युद्धग्रस्त शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तातडीच्या सुटकेसाठी आपले हवाई क्षेत्र विशेषतः भारतासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.

Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
इराणने युद्धग्रस्त शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तातडीच्या सुटकेसाठी आपले हवाई क्षेत्र विशेषतः भारतासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने उचललेले हे मोठे आणि धाडसी पाऊल भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय मानला जात आहे. 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत, आज (शुक्रवार) किमान १,००० भारतीय विद्यार्थी दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे.
इराणने हवाई मार्ग खुला केल्यानंतर पहिली विमानाची खेप आज रात्री ११ वाजता नवी दिल्लीत उतरणार आहे. हे विद्यार्थी इराणच्या मशहद शहरातून इराणी विमानाने दिल्लीला येतील. दुसरी आणि तिसरी उड्डाणे शनिवारी नियोजित आहेत. यापैकी एक विमान सकाळी, तर दुसरे संध्याकाळी पोहोचेल. दरम्यान, इराणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, ज्या भारतीय नागरिकांना इराण सोडून जायचे आहे, त्यांच्यासाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष कॉरिडॉरची व्यवस्था!
गेल्या आठ दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या काळात दोन्ही देश एकमेकांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे आणि बहुतेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवली आहेत. असे असूनही, भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी एक विशेष कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली आहे. भारताने बुधवारी इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले होते.
काही भारतीय विद्यार्थी जखमी
दिल्लीतील इराणी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही भारतीय विद्यार्थी इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. ते सर्व तेहरानमधील इराणी परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत. यापूर्वी, एकूण ११० भारतीय विद्यार्थ्यांचा पहिला गट बुधवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचला होता. यापैकी ९४ विद्यार्थी जम्मू-काश्मीरचे होते. हे सर्व विद्यार्थी उर्मिया मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते आणि त्यांना आर्मेनिया आणि दोहामार्गे बाहेर काढण्यात आले.
इराण आणि आर्मेनिया सरकारचे आभार
इराणमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत सरकार गेल्या अनेक दिवसांपासून इराणमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात उत्तर इराणमधून ११० भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे. भारत सरकारने या सुटकेच्या प्रक्रियेला सहकार्य केल्याबद्दल इराण आणि आर्मेनियाच्या सरकारांचे आभार मानले आहेत.