"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:59 IST2026-04-03T10:57:58+5:302026-04-03T10:59:32+5:30
या बैठकीत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रीही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारताची भूमिका अत्यंत ठामपणे मांडली...

"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. यातच इराणने 'होर्मुझच्या समुद्रधुनी'चा शस्त्राप्रमाणे वापर करायला सुरुवात केल्याने जवळपास संपूर्ण जगावरच तेलाचे भीषण संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर, इराणने बंद केलेली ‘होर्मुझची समुद्रधुनी’ पुन्हा सुरू करण्यासाठी ब्रिटनच्या पुढाकाराने ६० हून अधिक देशांची एक महत्त्वाची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रीही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारताची भूमिका अत्यंत ठामपणे मांडली.
३ भारतीय नाविकांचा मृत्यू -
माध्यमांतील वृत्तांनुसार, होर्मुज संकटाचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. आतापर्यंत विविध परदेशी जहाजांवर कार्यरत असलेल्या ३ भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण संघर्षाचे निराकरण केळ चर्चेतूनह होऊ शकते. यामुळे संवादातून मार्ग काढून तणाव कमी करण्याचे आवाहन भारताने केले.
या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे... -
दरम्यान, परराष्ट्र सचिव म्हणाले, "या संकटाचा भारतावर थेट परिणाम झाला आहे. आखाती प्रदेशात व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमध्ये भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे, सर्व संबंधित पक्षांमध्ये संवाद आणि कुटनीतिक संबंध पुन्हा सुरू करून तणाव कमी करणे." एवढेच नाही तर, "होर्मुझ नाकेबंदीमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे," असा इशाराही विक्रम मिस्री यांनी यावेली दिला.
ऊर्जा सुरक्षेला मोठा धोका -
इराणच्या आयआरजीसी (IRGC) सैन्याने होर्मुजची नाकेबंदी केल्यामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जगातील २० टक्के तेल आणि एलएनजीची आयात-निर्यात याच मार्गाने होतो. भारताची इंधन सुरक्षा मोठ्या प्रमाणावर पश्चिम आशियावर अवलंबून आहे. तसेच, ही नाकेबंदी जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचेही भारताने बजावले आहे.
ही होर्मुझ समिट म्हणजे, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या सरकारने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी सुरू केलेली एक बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय बैठक होती. युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच, इराणच्या लष्कराने, आयआरजीसीने, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, यामुळे भारत, चीन, जपान, मलेशिया आणि इंडोनेशियासह अनेक देशांमध्ये तेलाची समस्या निर्माण झाली आहे.