"भारताची भूमिका महत्त्वाची..., इराणसोबत युद्ध थांबवायचं असेल तर..."; इस्रायलने इराणसमोर ठेवल्या ४ मोठ्या अटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 10:32 IST2026-03-25T10:31:43+5:302026-03-25T10:32:53+5:30
"अमेरिका आणि इस्रायलचे संबंध अत्यंत दृढ आहेत. दोन्ही देश या मुद्द्यावर सारखाच विचार करत आहेत..."

"भारताची भूमिका महत्त्वाची..., इराणसोबत युद्ध थांबवायचं असेल तर..."; इस्रायलने इराणसमोर ठेवल्या ४ मोठ्या अटी!
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, सीझफायर अथवा युद्धबंदी संदर्भात चर्चा होताना दिसत आहे. यासंदर्भात आता भारतातील इस्रायलचे राजदूत रूवेन अजार यांनीही भाष्य केले असून इस्रायलची भूमिका स्पष्ट केली आहे. इस्रायल पूर्णपणे अमेरिकेच्या सोबत आहे, असे म्हणत युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले. दरम्यान शांततेसाठी काही अटीही आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
अजार म्हणाले, "इराणला युद्धबंदी हवी असेल, तर त्यांना आपला अणुकार्यक्रम आणि युरेनियम संवर्धन तत्काळ थांबवावा लागेल. तसेच बॅलिस्टिक मिसाईल्सचा कार्यक्रमही पूर्णपणे बंद करावा लागेल. याशिवाय, त्यांना हिजबुल्ला, हूती आणि हमास सारख्या दहशतवादी संघटनांना पाठबळ देणेही थांबवावे लागेल." तसेच, "इस्रायल थेट इराणशी नाही, तर इराणच्या धोरणांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांशी लढत असल्याचेही अजार यांनी यावेळी स्पष्ट केले.
इराणमध्ये लवकरच सत्तापालट -
"अमेरिका आणि इस्रायलचे संबंध अत्यंत दृढ आहेत. दोन्ही देश या मुद्द्यावर सारखाच विचार करत आहेत, असे म्हणत अजार यांनी एक मोठा दावा केला, इराणमध्ये लवकरच सत्तापालट होईल आणि तेथील जनताच विद्यमान राजवट उखडून टाकेल. इराण सध्या जागतिक स्तरावर एकाकी पडला असून त्यांना अपेक्षित असणारी मदत इतर देशांकडून मिळत नाहीये, ही इस्रायलसाठी जमेची बाजू असल्याचेही अजार यावेळी म्हणाले." ते एबीपी न्यूजसोबत बोलत होते.
भारताची भूमिका महत्त्वाची -
अजार म्हणाले, पश्चिम आशियामध्ये शांतता आणि संतुलन राखण्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. इस्रायलच्या सद्यस्थितीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "इराणकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे नागरिक अजूनही शेल्टरमध्ये जात आहेत. इस्रायलची संरक्षण यंत्रणा बळकट आहे." मात्र असे असले तरी, आतापर्यंत या संघर्षात २० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. इस्रायलला शांतता हवी आहे, मात्र ती इराणने आपल्या धोरणांत बदल केल्यावरच शक्य आहे, असेही अजार यावेळी म्हणाले.