India-Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे तोंडावर पडलेला पाकिस्तान काय आपल्या सवयी बदलायला तयार नाही. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारताविरुद्ध मोठे कट रचले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑपरेशन सिंदूरद्वारे नष्ट केलेले दहशतवादी लाँचिंग पॅड आणि प्रशिक्षण केंद्रे आता पुन्हा बांधली जात आहेत. हे विशेषतः पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या घनदाट जंगलांमध्ये सुरू आहे.
रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, पाकिस्तानी लष्कर आणि सरकार या दहशतवादी कारवायांना थेट पाठिंबा देत आहे. बहावलपूरमध्ये नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या छावण्या पुन्हा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि टीआरएफ सारख्या दहशतवादी संघटनांचे शीर्ष कमांडर, तसेच पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत उपस्थित होते.
हाय-टेक प्रशिक्षण शिबिरांची तयारीदहशतवादी छावण्या हाय-टेक तंत्रज्ञानाने सुसज्ज केल्या जात आहेत, जेणेकरून भारताच्या देखरेख संस्थांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण जाईल. या छावण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तानी लष्कराच्या विशेष सुरक्षा रक्षकांकडे सोपवण्यात आली आहे, जे ड्रोन, थर्मल सेन्सर्स, नाईट व्हिजन कॅमेरे यासारख्या आधुनिक तांत्रिक उपकरणांच्या मदतीने या भागांवर लक्ष ठेवतील.
अहवालात म्हटले आहे की, यावेळी दहशतवादी संघटनांनी त्यांची रणनीती बदलली आहे. आता २०० हून अधिक दहशतवाद्यांना एकाच छावणीत ठेवले जाणार नाही. त्याऐवजी, अनेक लहान छावण्या बांधल्या जात आहेत, ज्यामुळे भारतीय एजन्सींना त्यांचा माग काढणे कठीण होईल. प्रशिक्षण पूर्ण होताच, दहशतवाद्यांना ताबडतोब सीमेवर पाठवले जाईल.
भारतानेही दक्षता वाढवली या इनपुटनंतर, भारतीय सुरक्षा एजन्सींनी नियंत्रण रेषेजवळील हालचालींवर लक्ष ठेवणे अधिक तीव्र केले आहे. सैन्य आणि गुप्तचर संस्थांनी हाय अलर्ट जारी केला असून, पीओकेमध्ये पुन्हा स्थापित होणाऱ्या या तळांच्या उपग्रह प्रतिमा आणि ग्राउंड इंटेलिजन्सद्वारे पाळत वाढवण्यात आली आहे.
पाक सरकार आणि सैन्याचा पूर्ण पाठिंबासूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बहावलपूरमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली होती, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदशी संबंधित २०० हून अधिक दहशतवादी आणि त्यांचे कमांडर सहभागी झाले होते. याशिवाय या बैठकीत लष्कर-ए-तोयबाचे अनेक दहशतवादी आणि कमांडर देखील उपस्थित होते. या बैठकीत आयएसआयशी संबंधित अनेक अधिकारी देखील हजर होते. बैठकीत लाँचिंग पॅडच्या पुनर्संचयनासोबतच नवीन लाँचिंग पॅड आणि निधीवरही चर्चा झाली.
पाकिस्तान सरकार आणि सैन्य या योजनेला पूर्ण पाठिंबा देत आहे, ज्यामध्ये आर्थिक मदत देखील समाविष्ट आहे. जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या मोठ्या रकमेचा मोठा भाग या कटासाठी वापरला जाऊ शकतो. गुप्तचर संस्थांना माहिती मिळाली आहे की, सरकारच्या आदेशानुसार, मरकझच्या पुनर्संचयनाच्या नावाखाली दहशतवादी छावण्यांना मोठा निधी मिळत आहे.