"गेल्या रात्रीच्या हल्ल्यात..."; मध्य पूर्वेतील युद्धाच्या तणावात भारतासाठी आनंदाची बातमी, थेट सौदीतून आली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 11:17 IST2026-03-09T11:16:58+5:302026-03-09T11:17:52+5:30
सौदीत काम करणाऱ्या लाखो भारतीयांच्या कुटुंबांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

"गेल्या रात्रीच्या हल्ल्यात..."; मध्य पूर्वेतील युद्धाच्या तणावात भारतासाठी आनंदाची बातमी, थेट सौदीतून आली!
इराण आणि इस्रायल युद्दामुळे मध्य पूर्वेतील तणाव प्रचंड वाढला असतानाच सौदी अरेबियातूनभारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अल खर्ज प्रांतात काल सायंकाळी घडलेल्या एका भीषण घटनेत कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याचे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे. सौदीत काम करणाऱ्या लाखो भारतीयांच्या कुटुंबांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
लष्करी स्फोटके कोसळले, दोन ठार
सौदी नागरी संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अल खर्ज प्रांतातील एका निवासी भागात लष्करी क्षेपणास्त्र (Military Projectile) कोसळले. या दुर्दैवी अपघातात दोन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून ११ बांगलादेशी नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेत एक भारतीय नागरिकही जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
आम्ही सौदी प्रशासनाच्या सतत संपर्कात -
यासंदर्भात रियाधमधील भारतीय दूतावासाने 'X' वरून माहिती दिली की, "अल खर्जमधील घटनेत एकाही भारतीयाचा मृत्यू झाला नाही, ही समाधानाची बाब आहे. आम्ही सौदी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत." दूतावासाचे कौन्सुलर वाय. सबीर यांनी तातडीने अल खर्ज गाठून सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी भारतीयाची भेट घेतली.
सौदी अरेबियामध्ये अंदाजे २७ लाख भारतीय -
इराण युद्धाशी संबंधित वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. या प्रदेशात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या बातम्या येत असतानाच, भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्क आहे. सौदी अरेबियामध्ये अंदाजे २७ लाख भारतीय राहतात आणि काम करतात. महत्वाचे म्हणजे, दूतावासाने जखमी व्यक्तीच्या कुटुंबाशी संपर्क साधला असून, आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात आहे.