हिंसाचार सुरूच! बांगलादेशात जमावाने केलेल्या अमानुष मारहाणीत RAB अधिकाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 08:19 IST2026-01-20T08:17:58+5:302026-01-20T08:19:16+5:30
चितगाव जिल्ह्यातील सलीमपूर भागातून समोर आली आहे, जिथे रॅपिड ॲक्शन बटालियनच्या (RAB) टीमवर एका जमावाने हल्ला केला.

हिंसाचार सुरूच! बांगलादेशात जमावाने केलेल्या अमानुष मारहाणीत RAB अधिकाऱ्याचा मृत्यू
बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या जमावाच्या हिंसाचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना चितगाव जिल्ह्यातील सलीमपूर भागातून समोर आली आहे, जिथे रॅपिड ॲक्शन बटालियनच्या (RAB) टीमवर एका जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात एका RAB अधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली असून अन्य तीन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक मीडिया आणि सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, RAB ची टीम एका विशेष मोहिमेसाठी सलीमपूर परिसरात गेली होती. त्याचवेळी तिथे आधीच दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांच्या टोळीने टीमला घेरलं. पाहता पाहता परिस्थिती हाताबाहेर गेली आणि जमावाने अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. असं सांगण्यात येत आहे की, हल्लेखोरांनी काही अधिकाऱ्यांना ओलीस देखील ठेवलं होतं.
यादरम्यान एका अधिकाऱ्याला जमावाने इतकी अमानुष मारहाण केली की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतर अधिकाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे बांगलादेशातील वाढती हिंसा आणि ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या प्रेस विंगने जारी केलेल्या निवेदनानुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित एकूण ६४५ गुन्हे दाखल झाले, ज्यापैकी ७१ गुन्हे जातीय स्वरूपाचे मानले गेले. यामध्ये मंदिरांची तोडफोड, जाळपोळ, धमक्या आणि एका हत्येच्या प्रकरणाचा समावेश होता. उर्वरित ५७४ घटना या जमिनीचा वाद, शेजाऱ्यांशी भांडण, चोरी आणि बलात्कार यांसारख्या गुन्हेगारी किंवा सामाजिक कारणांमुळे घडल्याचं सांगण्यात आले.