‘मला शिकायचंय, माझं लग्न थांबवा !’; वसमतमध्ये दहावीतल्या मुलीचा बालविवाहाचा डाव अखेर उधळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:17 IST2026-01-21T13:14:32+5:302026-01-21T13:17:01+5:30
१५ वर्षीय मुलीने मुख्याध्यापकांकडे धाव घेत केली लेखी विनंती

‘मला शिकायचंय, माझं लग्न थांबवा !’; वसमतमध्ये दहावीतल्या मुलीचा बालविवाहाचा डाव अखेर उधळला
लोकमत न्यूज नेटवर्क, वसमत (जि. हिंगोली): ‘माझे वय १५ वर्षे आहे, पण घरच्यांनी लग्न २५ वर्षांच्या तरुणासोबत ठरवलंय. मला आता लग्न करायचं नाही, मला खूप शिकायचंय !’ काळजाचा थरकाप उडवणारी ही आर्त साद वसमत तालुक्यातील एका जि. प. शाळेत उमटली. स्वतःचे लग्न मोडण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने मुख्याध्यापकांकडे लेखी विनंती केल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
मुलीने धाडस दाखवत घरच्यांविरुद्ध केली तक्रार
वसमत तालुक्यातील एका गावच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचे लग्न तिच्या पालकांनी फेब्रुवारी महिन्यात निश्चित केले होते. मुलगी अल्पवयीन असताना आणि तिची शिकण्याची जिद्द असतानाही, कुटुंबीयांनी तिच्या मनाविरुद्ध हे लग्न लावून देण्याचा घाट घातला होता. मात्र, या अन्यायाविरुद्ध गप्प न बसता, त्या मुलीने धाडस दाखवले व शाळेच्या मुख्याध्यापकांना गाठून आपली कैफियत मांडली.
शिक्षणानेच दिला हक्क
सहसा ग्रामीण भागात बालविवाह सारख्या प्रथांविरुद्ध बोलण्यास मुली धजावत नाहीत. मात्र, या १५ वर्षीय मुलीने समाजाची आणि घरच्यांची पर्वा न करता, स्वतःचे भविष्य वाचवण्यासाठी जे पाऊल उचलले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘शिक्षण हा माझा हक्क आहे,’ हा संदेश तिने आपल्या कृतीतून दिला आहे.
बालविवाहाबाबत पालकांचे प्रबोधन करण्याची गरज
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुलीचे लग्न लावणे हा गुन्हा आहे. आता प्रशासनाकडून संबंधित मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम आणि मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन तिचे लग्न रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मुख्याध्यापक आणि प्रशासनाची तत्परता
विद्यार्थिनीच्या विनंती अर्जाची गांभीर्याने दखल घेत मुख्याध्यापकांनी तत्काळ पावले उचलली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून ग्रामविकास अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि लग्न रोखण्यासाठी लेखी पत्रही देण्यात आले. या पत्राची दखल घेऊन ग्रामपंचायत स्तरावर बालविवाह रोखण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली आहे.