हिंगोलीत लग्नात राडा! नवरदेवाचा बूट लपविण्यावरून वाद; दोघांच्या पोटात खुपसला खंजीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:36 IST2026-04-28T16:35:57+5:302026-04-28T16:36:44+5:30
"बूट तर परत मिळतील, पण नात्यातली ही दरी कशी भरून निघणार?" हिंगोली ग्रामीण पोलिसांकडून खंजीर हल्ल्यातील आरोपींचा शोध सुरू.

हिंगोलीत लग्नात राडा! नवरदेवाचा बूट लपविण्यावरून वाद; दोघांच्या पोटात खुपसला खंजीर
हिंगोली : लग्नात नवरदेवाचा बुट लपविण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून दोघांच्या पोटात खंजीर मारून जखमी केले. ही घटना तालुक्यातील कळमकोंडा येथे २६ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी चार जणांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथे २६ एप्रिल रोजी एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी वसमत तालुक्यातील गिरगाव येथील काही वऱ्हाडी मंडळी विवाह सोहळ्याला आली होती. यावेळी लग्नात नवरदेवाचा बुट लपविण्यावरून वाद झाला होता.हा राग मनात धरून चौघांनी गणेश जगन डाळ यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.यामध्ये एकाने त्यांच्या पोटात खंजीर मारून जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी श्रावण फुलाजी गाढवे (रा. कळमकोंडा) हे गेले असता त्यांनाही एकाने खंजीर मारून जखमी केले. इतरांनी लाथाबुक्याने मारहाण केली.जखमींना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक राहूल घुले, पोलिस अंमलदार राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी श्रावण फुलाजी गाढवे यांच्या फिर्यादीवरून विष्णू बालाजी कुंभारकर, प्रभू सोपन बारसे, अन्य दोघांविरूद्ध (सर्व रा. गिरगाव) यांचेविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात २८ एप्रिल रोजी गुन्हा नोंद झाला.