अडीच हजार बालमजूर होतील यशस्वी नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:41+5:30
बालकामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बालकामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांच्यातून यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न केला आहे. या बालमजुरांसाठी गोंदिया शहराच्या यादव चौक, मुर्री, गोंडीटोला, कुडवा, तिरोडा, पुराडा, मुरकुटडोह-दंडारी, गौतमनगर, सोनझरीटोला व एकोडी (नवरगाव) येथे शाळा उघडण्यात आल्या आहेत.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या, नदीतील रेतीतून सोने शोधणाºया, रेल्वेत भीक मागणाºया मांगगारूडी, पेंढारी व शाळाबाह्य बाल मजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरूवातीला बालसंक्रमण शाळांमध्ये टाकले होते. त्यातून शिकून नियमित शाळेत दाखल झालेले बालकामगार आता मुख्यप्रवाहात येत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील तब्बल अडीच हजार बालकामगार मुख्य प्रवाहात येत असून त्यांना यशस्वी नागरिक म्हणून घडण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
बालकामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बालकामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांच्यातून यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न केला आहे. या बालमजुरांसाठी गोंदिया शहराच्या यादव चौक, मुर्री, गोंडीटोला, कुडवा, तिरोडा, पुराडा, मुरकुटडोह-दंडारी, गौतमनगर, सोनझरीटोला व एकोडी (नवरगाव) येथे शाळा उघडण्यात आल्या आहेत. त्यातच बालमजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तत्परता दाखवून या बालकांसाठी संक्रमण शाळा उघडल्या. तसेच राष्ट्रीय बाल कल्याण समिती मार्फत प्रयत्न केले जात आहेत.
जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात. त्यामुळे बालकामारांचे उच्चाटण व्हावे यासाठी जिल्हाप्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये बालमजुरांची तपासणी झाली व त्यात ७०० बालकामगार आढळले. परंतु या बालकामगारांपैकी ४८९ आपल्या शाळेतील आहेत असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. तर २११ बालकामगार असल्याचे गृहीत धरले आहे. त्या बालकांच्या शिक्षणासाठी जिल्ह्यात आता ७ बालसंक्रमण शाळा सुरू होणार आहेत.
शिक्षक व इंजिनियर होणार
बालकामगार कार्यालयाने सन २००६ पासून आजतागायत अडीच हजाराच्या घरात बालकामगारांना पकडले. त्यापैकी पायाभूत शिक्षण सर्वांनी घेतले असले तरी शेकडो बालके १० वी व १२ वी झाले. विशेष म्हणजे, गोंदियाच्या भीमनगरातील मुनेश शेंडे हा डीएड झाला आहे. तर कुडवा येथील विजय कांबळे हा मुलगा इंजिनियर झाला आहे.
२४९७ बालमजूर मुख्यप्रवाहात
राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पांतर्गत शोधण्यात आलेल्या बालकामगारांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. सन २००५-०६ या वर्षात १९, २००६-०७ मध्ये ८६, २००७-०८ मध्ये २६६, २०११-१२ मध्ये ६३, सन २०१२-१३ ८९७, २०१३-१४ मध्ये २६६, २०१४-१५ मध्ये १, सन २०१५-१६ मध्ये २३, सन २०१६-१७ मध्ये १७८, सन २०१७-१८ मध्ये ५९, सन २०१८-१९ मध्ये २०४, सन २०१९-२० मध्ये ४३५ असे २४९७ बालमजूर मुख्य प्रवाहात आले आहेत.
सात संक्रमण शाळा लवकरच
जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात ७०० बालमजूर शोधण्यात आले. परंतु शोधण्यात आलेल्या या बालमजुरांना शिक्षण विभागाने स्पष्ट नाकारत ही संख्या एवढी नाहीच म्हटले. त्यावर पुन्हा शिक्षण विभागाने त्या ७०० पैकी २११ जणांना बालकामगार असल्याचे गृहीत धरले. त्या बालकांच्या शिक्षणासाठी जिल्ह्यात ७ बालसंक्रमण शाळा लवकरच सुरू होणार आहेत. बालसंक्रमण शाळेत शिकणाऱ्या बालकांना दरमहा ३५० रूपये निर्वाहभत्ता त्यांच्या खात्यात टाकला जातो. त्यांची नोंदणी शाळेत झाल्यावर त्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके देऊन त्यांच्यासाठी मध्यान्ह भोजनाची सोय केली जाते.