अवकाळी पावसाचा पुन्हा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:00 AM2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:10+5:30
हवामान विभागाने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया महसूल मंडळात झाली असून पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. तर आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यातच बुधवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोंदिया तालुक्यात ६६ मि.मी.पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १९.२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे गहू आणि हरभरा पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया महसूल मंडळात झाली असून पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. तर आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला.
पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. तर ११ जानेवारीपर्यंत पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने या नुकसानीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस अधून मधून पडत असल्याने धान खरेदी केंद्रावर ठेवलेल्या धानाला अंकुर फुटले आहे. त्यामुळे या धानाची खरेदी करणार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
यंदा जिल्ह्यात एकूण ३६ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे.यात २६ हजार हेक्टरवर धान तर १० हजार हेक्टरवर गहू आणि हरभरा या पिकांची लागवड करण्यात आली आहे.
पावसामुळे हरभरा आणि गहू हे दोन्ही पीक पूर्णपणे भूईसपाट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान पुन्हा अवकाळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामाला सुध्दा मुकावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पंचनामे करुन नुकसान भरपाई
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका १० हजार हेक्टरमधील गहू आणि हरभरा या पिकांना बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात या दोन्ही पिकांचे उत्पन्न मिळणे कठीण आहे. त्यामुळे शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढणार
जिल्ह्यात मागील चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे रब्बी हंगामातील तूर आणि इतर पिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांना पुन्हा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.