तुम्हाला नियमित स्वस्त धान्य मिळते काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:01:14+5:30
‘लोकमत’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून यासर्व प्रश्नांना वाचा फोडल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याची दखल घेत थेट या गावांपर्यंत पोहचून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तुम्हाला नियमित स्वस्त धान्य मिळतेय काय पासून ते कोणत्या योजनांचा लाभ मिळतो आदी प्रश्नांच्या माध्यमातून प्रथमच येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरु असताना सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह, दंडारीसह पाच गावात जाण्यासाठी अद्यापही रस्ते नाही. आरोग्य विषयक सुविधांसाठी येथील नागरिकांना रामभरोसे राहावे लागत आहे. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून यासर्व प्रश्नांना वाचा फोडल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याची दखल घेत थेट या गावांपर्यंत पोहचून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तुम्हाला नियमित स्वस्त धान्य मिळतेय काय पासून ते कोणत्या योजनांचा लाभ मिळतो आदी प्रश्नांच्या माध्यमातून प्रथमच येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे प्रथमच येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते.
गोंदिया जिल्ह्याची सीमा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याला लागून आहे. या दोन्ही राज्याच्या आणि गडचिरोली जिल्ह्याची सीमा भाग हा जंगलव्याप्त, अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलदृष्टया संवेदनशील असल्यामुळे जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह अन्य यंत्रणा कशाप्रकारे दक्ष राहून काम करीत आहे. याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शनिवारी सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्टया संवेदनशील असलेल्या मुरुकुटडोह, दंडारी, दलदलकुही आणि धनेगाव येथे भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला.
प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील अतिदुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्टया संवेदनशील भागात शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या व शिक्षणाच्या सुविधा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, घरकुल योजना, शालेय पोषण आहार व केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळत आहे किंवा नाही याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी याची माहिती जाणून घेतली. या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसीलदार सी.जी.पित्तुलवार व विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वैयक्तीक स्वच्छता आदी विषयांवरही चर्चा केली. या आजाराची कुठलीही लक्षणे असल्यास त्वरित सालेकसाचे तहसीलदार आणि आरोग्य यंत्रणेशी संपर्कसाधन्यास सांगितले.
दलदलकुही गावात नागरिकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत स्वस्त धान्य व सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत अन्न धान्याचा पुरवठा बरोबर होतो काय, दर महिन्याला तुरदाळ किंवा चनादाळ रेशन दुकानातून मिळते काय याची माहिती त्यांनी जाणून घेतली. घरकुल योजनेचा लाभ गावात किती जणांना मिळाला आहे. जर मिळाला असेल तर तो व्यवस्थित मिळाला आहे का, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ नागरिकांच्या खात्यात जमा होतो काय याबाबत माहिती जाणून घेतली. नागरिकांनी या वेळी आधारकार्डवर त्रुट्या असून बँक खात्याशी संलग्न न झाली नसल्याची समस्या मांडली. या त्रुट्या दूर करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले. गावातील शाळेत शालेय पोषण आहार व्यवस्थित मिळतो काय व आरोग्य विभातील अधिकारी, कर्मचारी, अगणवाडी सेविका गावात भेटीला येतात काय याची माहिती जाणून घेतली. ‘लोकमत’ने येथील नागरिकांच्या समस्या वृत्तमालिकेच्या माध्यमातून उचलून धरल्यानंतर प्रशासन येथे प्रथमच पोहचल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते.