लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रब्बी हंगाम सुरू झाल्याने आता पिकांसाठी खताची गरज पडणार आहे. ही बाब लक्षात घेत खताचा अवैध साठा करून ठेवणाऱ्या एका कृषी केंद्रावर धाड टाकून खताच्या १२७ बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. गोरेगाव तालुक्यातील ग्राम बबई येथे ही दिनांक २३ व २४ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात येथील उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, गोरेगाव तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गोरेगाव तालुक्यातील ग्राम बबई येथे विक्री करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या साठवून ठेवलेला खताचा अवैध साठा जप्त केला. यामध्ये किसान प्लस (२०:२०:०५) या खताच्या १२७ बॅग असून, जप्त केलेल्या खताच्या बॅग पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी श्री किसान बायो एग्रिटेक, जबलपूर कंपनी एजंट व ज्यांच्या घरी साठा सापडला त्यांच्याविरुध्द एफसीओ १९८५ ॲण्ड ईसीए १९५५मधील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रब्बी हंगामाला सुरूवात झाल्याने आता खतांचा काळाबाजार केला जाणार आहे. या खतांच्या काळा बाजारावर कृषी अधिकाऱ्यांची करडी नजर आहे. अशाप्रकारचा साठा किंवा या खताला विक्रीसाठी परवानगी नाही. असे खत विक्री होत असल्यास कृषी विभागाला कळवावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी महेंद्र मडामे यांनी केले आहे.