डिचोली तालुक्याची तहान लवकरच भागणार!; ६० कोटींचा प्रकल्प, पाणीपुरवठा होणार सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 13:25 IST2026-03-22T13:25:21+5:302026-03-22T13:25:21+5:30
आठ नव्या पाण्याच्या टाक्यांना मंजुरी, आमदार चंद्रकांत शेट्ये यांची माहिती

डिचोली तालुक्याची तहान लवकरच भागणार!; ६० कोटींचा प्रकल्प, पाणीपुरवठा होणार सुरळीत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : डिचोली मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलपुरवठा खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत मुळगाव येथे बैठक पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी आठ नव्या पाण्याच्या टाक्या उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जुन्या आणि जीर्ण पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम काही ठिकाणी पूर्णही झाले आहे. यामुळे पाणीपुरवठा नियमित होण्यास मदत होणार आहे.
पाण्यांच्या टाक्यांचे काम प्रगतीपथावर
नागझरवाडा आणि पाचवाडा येथे टाक्यांचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. गृहनिर्माण वसाहतीतील टाकी कार्यान्वित झाली असून, तेथील पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मेणकुरे-लांटबार्से पुनर्वसन आणि इतर ठिकाणी चार नवीन टाक्या उभारण्याचे नियोजन आहे. हरिजनवाडा आणि अडवलपाल येथे सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चुन विशेष टाकी उभारली जाणार आहे.
याशिवाय, मुळगाव येथील गावकरवाडा शिरोडवाडी येथे दोन पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, या सर्व योजनांमुळे पुढील ३० वर्षांसाठी पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा उद्देश असल्याचे आमदार डॉ. शेट्ये यांनी सांगितले.
२० एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पाचे काम सुरू
सुमारे ६० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येणाऱ्या २० एमएलडी क्षमतेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. या प्रकल्पामुळे उंच-सखल आणि पाणीटंचाई असलेल्या भागांपर्यंत पाणी पोहोचवणे शक्य होणार आहे. पडोस प्रकल्प बंद राहिला, तर सध्या काही भागांत दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा विसकळीत होण्याच्या समस्या आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या टाक्यांची उभारणी आणि सुधारित पायाभूत सुविधा यामुळे ही समस्या लवकरच दूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत आणि जलपुरवठा मंत्री सुभाष फळदेसाई व खात्याचे सहकार्य लाभत असल्याचेही आमदारांनी नमूद केले.
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या विनंतीनुसार विशेष बैठक घेऊन सर्व समस्यांचा आढावा घेण्यात आला असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांना मान्यता देण्यात आली आहे. आगामी काही महिन्यांत टाक्यांची कामे पूर्ण करून मतदारसंघातील पाणीपुरवठा नियमित करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. - सुभाष शिरोडकर, जलपुरवठा खात्याचे मंत्री