किनारी सुरक्षायंत्रणा बळकट, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; तटरक्षक अधिकाऱ्यांशी साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:30 IST2026-04-15T07:29:10+5:302026-04-15T07:30:41+5:30
राज्याची किनारी सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट आणि सुरक्षित करण्यावर या बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली.

किनारी सुरक्षायंत्रणा बळकट, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; तटरक्षक अधिकाऱ्यांशी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भारतीय तटरक्षक दलाचे गोव्यातील जिल्हा मुख्यालय ११ येथे तटरक्षक अधिकाऱ्यांशी संवाद साधत राज्याच्या किनारी सुरक्षा सज्जतेचा आढावा घेतला. या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार दाजी साळकर, कमांडर मनोज भाटिया आणि तटरक्षग दलाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याची किनारी सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट आणि सुरक्षित करण्यावर या बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली.
गोव्याला सुमारे १०५ किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण आणि पर्यटनदृष्ट्वा अत्यंत संवेदनशील किनारा लाभला आहे. राज्याची किनारपट्टी आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गाच्या जवळ असल्याने, तसेच मोठ्या प्रमाणात होणारी पर्यटकांची ये-जा आणि वाढत्या सागरी व्यापाराच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या सागरी सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महत्त्वाची जबाबदारी
तटरक्षक दलाचे गोव्यातील 'जिल्हा मुख्यालय ११' हे राज्यातील सागरी हद्दीचे रक्षण, मासेमारी करणाऱ्या बोटींची सुरक्षा, सागरी प्रदूषण रोखणे आणि आपत्कालीन शोध व बचाव मोहिमा राबविण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडते. मुख्यमंत्री सावंत यांनी घेतलेला हा आढावा आधुनिक आव्हानांचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.