लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात असलेल्या पुरसलगोंदी या गावातील ग्रामस्थांनी पायी चालत जाऊन सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास हेडरी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. निवडणुकीच्या दिवशी या गावातील गावकऱ्यांना हेडरी पोलिसांनी विनाकारण मारहाण केल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे. त्यांनी अशा आशयाचे एक निवेदन दिले आहे. यात शामराव झुरू कुळयेटी, सुधाकर अन्नू तलांडे, ईश्वर सोमा सडमेक, जलमसाय नवलू तलांडे, सोमा कार्या हिमाची, संतोष टोप्पो यांचा समावेश आहे. सध्या पोलिसांसोबत बोलणे सुरु आहे, सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत. ११ एप्रिल रोजी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी पुरसलगोंदी येथे असलेल्या बूथ क्र. ८३ वर दुपारी ३ वाजता मतदान संपले. त्यानंतर येथे असलेल्या गावकऱ्यांना पोलि
सांनी पोलिंगचे साहित्य हेडरी येथे नेण्यासाठी मदत करायला सांगितले. त्यानुसार काही गावकऱ्यांनी हे साहित्य डोक्यावर वाहून नेत हेदरी गाठले. तेथे त्यांना दोन तास रोखून धरल्यानंतर पोलिसांनी लाठ्यांनी त्यांना मारहाण केली असे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एरव्ही मतदानाचे सामान नेण्याआणण्यासाठी मोबदला व संरक्षण मिळते मात्र आम्हाला फक्त मारहाण झाली असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामुळे गावकरी भयभीत झाले असून, दोषी पोलिसांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.