Join us  

आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 9:13 AM

आमिरने रिना दत्ताबरोबरचा एक किस्सा शेअर केला आहे. रिनाने कानशिलात लगावली होती, असा खुलासा आमिरने केला आहे. 

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण अभिनयाबरोबरच आमिर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. कधी पहिली पत्नी रिना तर कधी किरण रावमुळे आमिर चर्चेचा विषय ठरतो. किरण रावबरोबरचे आमिरचे अनेक किस्से प्रेक्षकांन माहित आहेत. पण, आता पहिल्यांदाच आमिरने रिना दत्ताबरोबरचा एक किस्सा शेअर केला आहे. रिनाने कानशिलात लगावली होती, असा खुलासा आमिरने केला आहे. 

आमिरने नुकतीच द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. यावेळी त्याने एक्स पत्नी रिना दत्ताबद्दल बोलताना तिने कानशिलात लगावल्याचा खुलासा केला. आमिरचा लेक जुनैद खानच्या वेळी रिना गरोदर असताना हा किस्सा घडल्याचं आमिरने सांगितलं. तो म्हणाला, "मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी काय नोटीस केलं आहे. ज्यादिवशी जुनैदचा जन्म झाला तेव्हाचा हा किस्सा आहे. रीनाला प्रसुतीच्या कळा सुरू होत्या. आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि एक चांगला नवरा होण्याच्या उद्देशाने मी तिला अशावेळी श्वास कसा घ्यायचा याबद्दल सांगत होतो."

"तिच्या प्रसुतीच्या कळा वाढत होत्या. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. पण, तेव्ही रीनाने माझ्या कानशिलात लगावली. तुझी बकवास बंद कर, असं ती मला म्हणाली. तिला खूप त्रास होत होता. त्यामुळे तिने माझ्या हाताचाही चावा घेतला. थोड्यावेळाने माझ्या आजूबाजूला काय घडतंय याची मला जाणीव झाली. मी रीनाकडे पाहिलं तेव्हा तिला खूप त्रास होत असल्याचं जाणवलं. जुनैदच्या जन्मानंतर मी ही गोष्ट रीनाला सांगितली. तेव्हा तिला राग आला," असंही आमिरने पुढे सांगितलं. 

आमिरने १९८६मध्ये रीनाशी लग्न केलं होतं. सुखी संसाराच्या १६ वर्षांनंतर २००२ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. पहिल्या पत्नीपासून आमिरला जुनैद आणि इरा ही दोन मुले आहेत. रिनाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने २००५ साली किरण रावशी लग्न करत संसार थाटला होता. २०२१मध्ये त्यांनी वेगळं होत असल्याची घोषणा केली. 

टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटी