३१ मार्चपूर्वी कर्ज भरा अन् व्याजमाफीचा लाभ घ्या ! सहकारी बँकेमार्फत सर्वाधिक वितरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 20:09 IST2026-03-20T20:08:18+5:302026-03-20T20:09:13+5:30
Gadchiroli : मार्च महिना संपण्यास केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने जिल्ह्यातील बँकांमध्ये पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.

Pay your loan before March 31 and avail interest waiver! Highest disbursement through cooperative banks
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: मार्च महिना संपण्यास केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने जिल्ह्यातील बँकांमध्ये पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. ३१ मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळत असल्याने शेतकरी इकडून तिकडून पैशांची जुळवाजुळव करत बँकांकडे धाव घेत आहेत.
शासनाच्या धोरणानुसार, ३१ मार्चपर्यंत कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजातून पूर्णतः माफी मिळते. हे बिनव्याजी कर्ज जवळपास नऊ ते दहा महिने वापरता येत असल्याने शेतकऱ्यांसाठी हा पर्याय अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
२३ हजार शेतकऱ्यांनी उचलला लाभ
मागील खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील २२ हजार ५०४ शेतकऱ्यांना सुमारे १२५ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले होते. १८ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार, १४ हजार २५३ शेतकऱ्यांनी ७३ कोटी ५७लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. ही एकूण वाटपाच्या ५८.६६ टक्के वसुली असून, उर्वरित १२ दिवसांत यात मोठी वाढ होण्याची शक्यता बैंक प्रशासनाने वर्तवली आहे.
शेतकऱ्यांची धावाधाव सुरू, पण चुकारे रखडले !
अनेक शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत केंद्रांवर धानाची विक्री केली आहे. मात्र, अद्याप थानाचे चुकारे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. एकीकडे ३१ मार्चची मुदत जवळ आली आहे आणि दुसरीकडे हातात पैसे नाहीत, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. व्याजाचा भुर्दंड टाळण्यासाठी अनेक शेतकरी उसनवारी करून किंवा खासगी सावकारांकडून पैसे घेऊन बँकेचे कर्ज नील करत असल्याचे चित्र आहे.
सहकारी बँकेमार्फत सर्वाधिक वितरण
सेवा सहकारी संस्था आणि आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँक थेट गावागावांत पोहोचली आहे. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांची खाती याच बँकेत असल्याने आणि सोप्या प्रक्रियेमुळे शेतकरी या बँकेलाच पहिली पसंती देतात.
बचत गटापेक्षा पीक कर्ज ठरतेय फायदेशीर
शेतकरी एप्रिल महिन्यात नवीन कर्जाची उचल करतात आणि त्याची परतफेड पुढील वर्षी मार्चमध्ये करतात. बचत गटाला व्याज भरून देण्यापेक्षा पीक कर्जाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्जाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
"३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केल्यास त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. शेतकऱ्यांना केवळ मुद्दल रक्कम भरायची असते. त्यामुळे व्याजाचा बोजा टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज भरावे. नवीन कर्ज लवकरच दिले जाते."
- सतीश आयलवार, सीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोली.