कोरोना रूग्णांचे शतक पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:01:14+5:30
शनिवारी रात्री उशीरापर्यंत २२ सीआरपीएफ जवान व भामरागड तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच वेळी २३ रूग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढला. अशातच पुन्हा रविवारी सायंकाळी १८ रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकाच दिवशी ४१ रूग्णांची भर पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २२ सीआरपीएफ जवान व १९ सामान्य नागरिक असे एकूण ४१ जणांचे कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी कोरोना बाधीतांची संख्या ११५ पोहोचली आहे. एकाच दिवशी रूग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. तर नागरिकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी रात्री उशीरापर्यंत २२ सीआरपीएफ जवान व भामरागड तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच वेळी २३ रूग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढला. अशातच पुन्हा रविवारी सायंकाळी १८ रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकाच दिवशी ४१ रूग्णांची भर पडली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी कोरोना रूग्णांची भर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
१८ बाधीतांमध्ये दोन महिला व १६ पुरूषांचा समावेश आहे. यामध्ये अहेरी येथील एक पुरूष तीव्र जोखमीचा आहे. तो अहेरी येथीलच एका कोरोना बाधीताच्या संपर्कात आला होता. इतर १७ जणांमध्ये तामिळनाडू राज्यातून ट्रकने आलेले आठ कामगार, ठाणे येथून आलेले तीन नागरिकांचे एक कुटुंब, वाशिमवरून परतलेले दोघांचे कुटुंब, हैदराबाद येथून आलेला एक जण, अरूणाचल प्रदेशातून आलेला बीएसएफचा जवान, जम्मू-काश्मिर येथून आलेला सीआरपीएफचा जवान व दिल्ली येथून आलेल्या एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील एक, धानोरा तालुक्यात पाच, एटापल्लीतील तीन, चामोर्शीतील एक, गडचिरोली तालुक्यातील सात, तर अहेरी तालुक्यातील एक आहेत. ११५ कोरोना रूग्णांमध्ये २६ सीआरपीएफचे जवान, दोन बीएसएफचे जवान, ४३ कामगार व अन्य ४४ व्यक्तींचा समावेश आहे. एकूण ११५ रूग्णांपैकी आठ रूग्णांच्या नोंदी दुसºया जिल्ह्यात झाल्या असल्याने गडचिरोली जिल्ह्यात १०७ कोरोना रूग्णांची नोंद राहणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे -जिल्हाधिकारी
जिल्ह्यातच एकाच दिवशी सुमारे ४१ रूग्णांची भर पडल्याने नागरिकांनी घाबरून न जाता संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष सतर्क राहावे. विनाकारण घराबाहेर टाळावे. तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधावा. जिल्ह्याबाहेरून आलेल्यांच्या नोंदी प्रशासनाकडे कराव्यात. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.