कुरखेडा बाजारात मिरचीची आवक वाढली
By Admin | Updated: April 5, 2017 01:23 IST2017-04-05T01:23:34+5:302017-04-05T01:23:34+5:30
उन्हाळ्याला सुरूवात होताच कुरखेडा आठवडी बाजारात सुकलेल्या लालमिरचीची आवक वाढण्यास सुरूवात झाली आहे.

कुरखेडा बाजारात मिरचीची आवक वाढली
१०० क्विंटल लाल मिरचीची विक्री : आठवडी बाजार फुलला; केशोरी मिरची विदर्भात प्रसिद्ध
संदीप बावनकुळे कुरखेडा
उन्हाळ्याला सुरूवात होताच कुरखेडा आठवडी बाजारात सुकलेल्या लालमिरचीची आवक वाढण्यास सुरूवात झाली आहे. ग्राहक व विक्रेते यांच्या गर्दीमुळे कुरखेडा बाजार फुलून गेला आहे.
कुरखेडा तालुक्यात केशोरी या जातीच्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. केशोरी मिरची संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर नंतर कुरखेडा येथील केशोरी मिरचीचा बाजार प्रसिध्द आहे. कुरखेडा येथील मिरची गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, छत्तीसगड व आंध्रप्रदेशातही निर्यात केली जाते. केशोरी मिरचीची मोठी बाजारपेठ कुरखेडा येथे असल्याने तालुकाभरातील शेतकरी आपली मिरची बैलबंडी, दुचाकी, चारचाकी वाहन किंवा सायकलद्वारे कुरखेडा येथेच विक्रीसाठी आणतात. या ठिकाणी मिरचीची ठोक विक्री केली जाते. त्यामुळे इतर बाजारांच्या तुलनेत कुरखेडा येथे स्वस्त दरात मिरची उपलब्ध होत असल्याने ग्राहकही कुरखेडा येथूनच मिरची घेण्यास पसंती दर्शवितात. काही ग्राहक दुसऱ्या जिल्ह्यातील आपल्या नातेवाईकांसाठीही मिरची खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढते. दर आठवडी बाजारात जवळपास १०० क्विंटल मिरचीची विक्री केली जाते, दर आठवड्याला लाखोंची उलाढाल मिरचीच्या माध्यमातून होते, अशी माहिती आठवडी बाजारात मिरची विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे. राज्यभरातील मिरची पावडर तयार करणाऱ्या कंपन्याही केशोरी मिरचीची खरेदी करतात.
मागील दहा वर्षांत मिरचीचे क्षेत्र घटले
१० वर्षांपूर्वी मालेवाडा, कढोली परिसरात शेकडो हेक्टरवर मिरचीची लागवड केली जात होती. मात्र दिवसेंदिवस या परिसरातील मिरचीचे क्षेत्र घटत चालले असल्याचे दिसून येत आहे. शेतकरीवर्ग मिरची ऐवजी मका, धान व इतर पिकांकडे वळला असल्याचे दिसून येत आहे. इतर पिकांच्या तुलनेत मिरची पिकाला मेहनत व खर्च अधिक आहे. मात्र त्या तुलनेत नफा मिळत नसल्याची माहिती बाजारात आलेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे.