Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 19:37 IST2026-01-12T19:34:46+5:302026-01-12T19:37:11+5:30
PMC Election 2026: पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात घमासान सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच अजित पवारांनी एक मोठं विधान केलं.

Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) असाच सामना सुरू आहे. राज्यात सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारभाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर मोठमोठे आरोप करत आहेत. यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांकडूनही अजित पवारांवर पलटवार करण्यात आले असून, यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केले.
अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही. त्यांचा संयम ढळला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. एका मुलाखतीत बोलताना अजित पवार म्हणाले, "गरज पडल्यास आपण दिल्लीत जाऊन चर्चा करू. मुख्यमंत्री फडणवीस यांचे तसे मत असू शकते, पण आता महापालिकेचे मतदान पार पडल्यानंतर मी त्यांच्याशी बोलेन."
दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करू
याच मुद्द्यावर अजित पवार पुढे म्हणाले, "आम्ही त्याबाबत बोलू. तो आमच्या दोघातील प्रश्न आहे. आम्ही सरकारमध्ये जात असताना आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करूनच गेलो आहोत. आम्ही खालच्या नेत्यांशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे आम्ही ज्यांच्याशी चर्चा करून सरकारमध्ये सहभागी झालो, केंद्रामध्ये आणि राज्यात; त्यांच्याशी मी चर्चा करेन. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील प्रमुखांसोबत आम्ही चर्चा करू", असे विधान अजित पवारांनी केले.
"देवेंद्र फडणवीस यांनी जो मुद्दा उपस्थित केला, मी जर तुमच्याशी चर्चा करून या प्रक्रियेमध्ये आलेलो असेल, तर फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर मला वरिष्ठांसोबत देखील (दिल्ली) जाऊन चर्चा करावी लागेल. तसं वाटलं तर हा विषय तिथपर्यंत (दिल्ली) जाईल", अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
रवींद्र चव्हाणांनी पहिल्यांदा व्यक्त केली होती नाराजी
अजित पवारांनी ७० हजार कोटी भ्रष्टाचार प्रकरणावर बोलताना भाजपाकडेच बोट दाखवत कोंडी केली. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. "अजित पवार हे भाजपासोबत कशापद्धतीने जोडले गेले, सर्वांना माहिती आहे. त्यांना सोबत घेण्याबद्दल पुणे-पिंपरी-चिंचवड पक्षाचे पदाधिकारी मला थोडा विचार करा म्हणून सांगत होते."
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी नेहमी खासगीमध्ये सांगायचो की, थोडा विचार करा. पण, आता पवार यांना सोबत घेत असल्याचा पश्चाताप होत आहे", असे चव्हाण म्हणाले होते.