देसाईगंज तालुक्यात इटियाडोह पाटबंधारे सिंचन विभागाच्या माध्यमातून व उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान फसल लावण्यात आली होती. मे महिन्याच्या मध्यान्हात फसल निघाली तसेच दरम्यान, पावसाचे सावट घोंघावत असल्याने मळणी केलेले धान ठेवायचे कुठे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमाेर उभा ठाकला होता. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना धान विकले. दरम्यान व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून १,२०० ते १,३५० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करून धानाची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली. शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेले सातबारा विचारात न घेता खासगी व्यापाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सातबाराच्या आधारे धान खरेदी करण्यात येत आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येत असलेल्या प्रति क्विंटल धानामागे २० रुपये गोडाऊन किरायाही शेतकऱ्यांकडूनच वसूल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांकडून हमालीसुद्धा घेता येत नसताना प्रति ४० किलो बोऱ्यावर ८ रुपये घेतल्या जात असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची लूट होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित धान खरेदी संचालक मंडळाची आहे.