देसाईगंज : अवैध वृक्षताेड व प्रदूषणामुळे ग्लाेबल वार्मिंगचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. वन विभागातर्फे वृक्ष संवर्धन व वृक्षलागवडीवर भर दिला जात आहे. देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील मुरमाळ जागेवर वन विभागाने लावलेली रोपटे आजमितीस वृक्षात रुपांतरित झाली आहेत. देसाईगंज वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पुढाकाराने लावलेली झाडे आता डाैलात बहरली आहेत.
वडसाचे वन परिक्षेत्राधिकारी आर. एम. शिंदे यांच्या पुढाकाराने वन विभागाच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटवून धडक वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेऊन वृक्ष लागवड करून संरक्षण व संवर्धनावर जोर देण्यात आला. कोंढाळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसह वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनावर अधिक भर देण्यात आल्याने येथील जंगल मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांच्या संचाराने गजबजू लागले आहे. विशष म्हणजे, डोंगरमेंढा येथील जैव विविधतेने नटलेल्या जंगलाची आधीच केंद्र शासनाने दखल घेऊन शंकरपूर ग्रामपंचायत अंतग॔त येणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला गौरविले आहे. एकलपूर, कसारी, पिंपळगाव (ह.), शिवराजपूर या गावांना उपलब्ध जंगलाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित करुन रोजगार उपलब्ध करून दिल्याने या परिसरात वनाचे संवर्धन झाले. असाच बाेध कुरुड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडेगाव/रिठ येथील वन विभागाच्या जागेसाठी घेण्यात आला. येथील अतिक्रमण हटवून धडक वृक्ष लागवड मोहीम हाती घेऊन अतिक्रमणधारकांवर धडक कारवाई करण्यात आली. वन विभागाच्या धडक कारवाईचा अतिक्रमण धारकांनी चांगलाच धसका घेतला. अतिक्रमण हटविणे व वृक्षलागवड करण्याच्या उपक्रमासाठी नुकतेच निवृत्त झालेले सहाय्यक उपविभागीय वनसंरक्षक व्ही.बी.कांबळे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. यामुळे वडसा वन विभागाच्या अथक परिश्रमामुळेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगले बहरु लागली आहेत. वाढत्या वन्य प्राण्यांच्या संख्येमुळे स्थानिक नागरिकांना जीव गमवावा लागू नये यासाठी युद्धस्तरावर अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वडसाचे वन परिक्षेत्राधिकारी आर.एम. शिंदे यांनी दिली. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.
बाॅक्स...
२० हेक्टर जागेत लागवड, मातीपरीक्षणाचा आधार
वन परिक्षेत्राधिकारी आर.एम. शिंदे यांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत जंगलांची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्वात आधी वन विभागाची २० हेक्टर जागा मोकळी केली. संपुर्ण जागा कुंपणाखाली आणून वन विभागाच्या उपलब्ध एकूण २० हेक्टर जागेत ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत एकूण २२ हजार २२० वृक्ष लागवड करुन त्यांचे संरक्षण व संवर्धन शिवराजपूर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून केले आहे. मुरमाळ जागेवर हेक्टरी १ हजार १११ रोपटी लावण्यात आली. प्रत्येक रोपातील अंतर ३ बाय ३ मीटर ठेवण्यात आल्याने लावलेली सर्वच रोपे आज जिवंत आहेत. पर्यायी मिश्र रोपवनांतर्गत माती परीक्षण करुन त्या जागेवर तग धरु शकणारीच विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत.