Devgad Hapoos vs Ratnagiri Hapoos : उन्हाळ्याकडे लोक सुट्ट्यांसाठी तर नजर लावून बसलेले असतातच, सोबतच आणखी एका खास गोष्टीसाठी ते उन्हाळ्याची वाट बघतात. ती म्हणजे मनाला आणि जिभेला मोहिनी घालणाऱ्या आंब्यांसाठी. फळांचा राजा म्हटलं जाणारं आंबा हे एक असं फळ आहे जे कुणाला आवडत नाही किंवा त्यांची चव कुणी चाखली नसेल, असं कुणी सापडणार नाही. आंब्याचं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. या दिवसांमध्ये लोक आंबे खाण्याचा मनमुराद आनंद लुटतात. आंबा म्हटला की, हापूस आंब्याचा उल्लेख होणार नाही असं होणार नाही. देवगड आणि रत्नागिरीतील हापूस आंब्यांना अधिक मागणी असते. भरपूर लोक दोन्ही प्रजातीच्या आंब्यांचा आनंद घेतात. पण अनेकांना देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूसमध्ये नेमका काय फरक असतो हे माहीत नसतं. या दोन्हीतील फरक आज आपण पाहणार आहोत. जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने दोन्ही आंबे खाण्याचा आनंद लुटता येईल.
देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे दोन्ही कोकण किनारपट्टीवरील सर्वोत्कृष्ट आणि जागतिक दर्जाचे आंबे आहेत. काही आंबे कमालीचे गोड असतात, तर काही आंब्यांची चव ही आंबट-गोड असते. फरक काही का असेना पण ते खाण्याची मजा काही औरच असते. आंब्याची चव घेताच, मन एका वेगळ्याच विश्वास हरवतं. पण प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते, त्यामुळे या दोन्हीतील फरक माहीत असणं गरजेचं ठरतं.
देवगड आणि रत्नागिरी हापूसमधील फरक
चव आणि सुगंध: देवगड हापूसचा सुगंध अतिशय तीव्र आणि मनमोहक असतो. चवीला तो जास्त गोड असतो. रत्नागिरी हापूसमध्ये गोडव्यासोबत किंचित आंबटपणाची चव असते आणि तो अधिक रसाळ असतो. रत्नागिरी हापूसचा सुगंध सौम्य असतो.
रंग आणि पोत: देवगड हापूस आंबा पिकल्यावर केशरी-सोनेरी रंगाचा होतो, तर रत्नागिरी आंबा पिवळ्या-केशरी रंगाचा होतो. देवगडचा गर अतिशय मऊ, बटरसारखा आणि फायबरविरहित असतो. तर रत्नागिरीचा गर थोडा फायबरयुक्त पण तरीही स्मूथ असतो.
सालीचा जाडपणा: दोन्ही आंब्यांची साल पातळ असते, परंतू देवगड हापूसची साल तुलनेने थोडी अधिक जाड आणि चिवट असते, ज्यामुळे तो जास्त काळ टिकतो.
देवगड हापूसचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा तीव्र आणि मोहक सुगंध, जो संपूर्ण खोलीत पसरून फळांचा आणि फुलांचा सुगंध देतो. याशिवाय, या आंब्याची शेल्फ लाइफ तुलनेने जास्त असते, ज्यामुळे आपल्याला त्याची चव अधिक काळ आनंदाने उपभोगता येते.
रत्नागिरीचे आंबे त्यांच्या वेगळ्या आकारासाठी आणि तितक्याच आकर्षक चवीसाठी ओळखले जातात. देवगड हापूसच्या तुलनेत त्यांचा गर थोडा अधिक फायबरयुक्त असू शकतो, पण त्याची भर ते त्यांच्या समृद्ध, आंबट-गोड चवीने काढतात, ज्याची छान आणि टिकणारी आफ्टरटेस्ट जाणवते.
म्हणजेच काय तर, जर तुम्हाला फायबरविरहित आणि अतिशय गोड आंबा आवडत असेल, तर देवगड हापूस उत्तम पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला रसाळ, गोड-आंबट आणि मऊ आंबा आवडत असेल, तर रत्नागिरी हापूस उत्तम ठरू शकतो. दोन्हींमध्ये काही फरक असले तरी दोन्हींच्या चवींमध्ये आपापला एक वेगळाच आनंद आहे.
Web Summary : Devgad and Ratnagiri Hapus mangoes are both delicious, but differ in taste, texture and aroma. Devgad is sweeter and more fragrant, while Ratnagiri offers a tangy sweetness. Choose based on your preference for a fiber-free, intensely sweet mango or a juicy, sweet-tangy experience.
Web Summary : देवगढ़ और रत्नागिरी हापुस आम दोनों स्वादिष्ट हैं, लेकिन स्वाद, बनावट और सुगंध में भिन्न हैं। देवगढ़ अधिक मीठा और सुगंधित है, जबकि रत्नागिरी में तीखी मिठास है। फाइबर मुक्त, तीव्र मीठे आम या रसदार, मीठे-खट्टे अनुभव के लिए अपनी पसंद के अनुसार चुनें।