कास तलावाला कचऱ्याचे ग्रहण, पर्यावरणावर घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:52 IST2020-11-04T17:49:56+5:302020-11-04T17:52:39+5:30
KasPathar, Garbage Disposal Issue, Satara area, environment सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव परिसरात मोठया प्रमाणावरील काचांच्या तुकडयांमुळे कचरा, घाणीच्या विळख्यांमुळे निसर्गरम्य कासचा श्वास घाणीत घुटमळू लागला आहे. कास तलावाला स्वच्छतेची प्रतिक्षा असून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीच्या साम्राज्याने निसर्गप्रेमी नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

कास तलावाला कचऱ्याचे ग्रहण, पर्यावरणावर घाला
पेट्री/सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव परिसरात मोठया प्रमाणावरील काचांच्या तुकडयांमुळे कचरा, घाणीच्या विळख्यांमुळे निसर्गरम्य कासचा श्वास घाणीत घुटमळू लागला आहे. कास तलावाला स्वच्छतेची प्रतिक्षा असून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीच्या साम्राज्याने निसर्गप्रेमी नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
काचा, दारुच्या बाटल्या, पिशव्या, कागदी बोळयांनी कास परिसर अस्वच्छ बनला असून पाणी प्रदूषण होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी चुली मांडून धुराचे लोटच्या लोट व तेथीलच परिसरातील सरपण गोळा करून हवेच्या प्रदुषणाबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. दरम्यान शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी गाडीतल्या कर्णकर्कश डेकवर काही तरूणाई थिरकत असल्याने कास तलावावर पाणी पिण्याच्या मार्गावर असणाऱ्या वन्य पशुपक्ष्यांना आपला मार्गही बदलावा लागत आहे.
कास तलाव परिसरातील या कचऱ्यांमध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमुळे भविष्यात जणू काही कास तलाव काच तलाव म्हणून ओळखला जाऊ नये, यासाठी पर्यटनास आलेल्या प्रत्येक पर्यटकांनी आपली मानसिकता बदलून स्वच्छ कास राहावा यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. पाण्यात जलविहार करणे, पार्ट्यांची तेलकट भांडी , साबण अथवा डिटर्जंटने धुणे, काठावर गाडया लाऊन वाहनांचे वॉशिंग करणे यामुळे पाणी दुषित होण्याचा संभव अधिक असून तेल, साबणाचा फेस, ऑईल यामुळे जलचर प्राण्यांच्या जीवितास धोका उदभवण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने या परिसरात पर्यटनास बंदी होती. परंतू सध्या कास तलावावर बहुसंख्य पर्यटक गर्दी करत आहेत ; वाढत्या अस्वच्छतेने पर्यावरणप्रेमीतून नाराजीचे सुर उमटत आहेत.