प्रणवदांच्या भाषणामुळे संघ लगेच बदलेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:21 AM2018-06-09T02:21:34+5:302018-06-09T02:21:34+5:30

तुमचं भाषण विसरलं जाईल, पण तुम्ही संघस्थानी हजर होतात, ही दृश्यं मात्र भविष्यात कायम राहतील, त्याचबरोबर तुमच्या भाषणाचा अर्थ काढणाऱ्या खोट्या बातम्यादेखील, अशी स्वत:च्या मुलीनं केलेली टीका.

 Will the team change immediately because of Pranabad's speech? | प्रणवदांच्या भाषणामुळे संघ लगेच बदलेल का?

प्रणवदांच्या भाषणामुळे संघ लगेच बदलेल का?

Next

- डॉ. उदय निरगुडकर
(न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक)

तुमचं भाषण विसरलं जाईल, पण तुम्ही संघस्थानी हजर होतात, ही दृश्यं मात्र भविष्यात कायम राहतील, त्याचबरोबर तुमच्या भाषणाचा अर्थ काढणाऱ्या खोट्या बातम्यादेखील, अशी स्वत:च्या मुलीनं केलेली टीका. काँग्रेसच्या अहमद पटेलांनी ‘प्रणवदा तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं’, असं म्हणणं. डाव्यांनी केलेला विरोध. या सगळ्या पार्श्वभूमीवर तब्बल तीन दिवसांकरिता केवळ संघाच्या कार्यक्रमासाठी प्रणव मुखर्जी नागपुरात आले. त्यावेळी अपेक्षेप्रमाणं काँग्रेसच्या कोणत्याही पदाधिकाºयानं त्यांचं स्वागतही केलं नाही. हेडगेवार यांच्या घराला भेट देताना पायºया उतरण्यासाठी सरसंघचालक भागवतांनी हात पुढे केला, हे साºया भारतानं पाहिलं. भारमातेचे थोर सुपुत्र असा हेडगेवारांचा गौरव प्रणव मुखर्जींनी केला तर दुसरीकडे संघाची प्रार्थना सुरू असताना संघाच्या पद्धतीनं नमन करणं मात्र त्यांनी टाळलं. प्रणवदांच्या येण्यानं एक मात्र नक्की झालं. संघाचा द्वेष करा अथवा कौतुक. पण संघाकडे दुर्लक्ष करता येत नाही, हे खरं. विचारवंतांचा एक गट काँग्रेसची धर्मनिरपेक्षता ही हिंदूविरोधी, असं मानतो. तर विचारवंतांचा एक गट संघांची विचारसरणी ही मुस्लीमविरोधी, असं मानतो. या विभिन्न विचारसरणीतून आलेल्या दोन विभिन्न नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी केवळ भारतातल्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मीडियाचे कान टवकारले होते. प्रणवदासांठी संघानं परंपरेला छेद दिला. सरसंघचालकांनी शेवटी बोलण्याची परंपरा यावेळी बाजूला सारली. ३२ मिनिटं ते बोलले. भागवतांच्या भाषणात सर्वसमावेशकतेचा सूर होता. मुखर्जींच्या आमंत्रणावरून वाद अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेडगेवार दोनवेळा काँग्रेसच्या आंदोलनात जेलमध्ये गेल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. संघ हा फक्त हिंदूंपुरता मर्यादित नाही. संघ सर्वांना जोडणारी संघटना असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं. भारताचा राष्ट्रवाद वसुधैव कुटुंबकमनं प्रेरित आहे. विविधता जपलीच पाहिजे. एक धर्म ही भारताची ओळख असू शकत नाही, असं त्यांनी संघाच्या व्यासपीठावरून ठणकावलं. यामुळे संघ अधिक चांगला समजण्यासाठी मदत होईल की यामुळे प्रणवदा यांच्याबद्दल गैरसमज वाढतील? त्यांच्या राष्ट्र, राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रप्रेम याबद्दल आता चर्चा होत राहणार हे नक्की.
काँग्रेस, डाव्यांचा विरोध डावलून प्रणवदा संघाच्या व्यासपीठावर गेले, हे एकप्रकारे बरंच झालं म्हणायचं. कारण भिन्न विचारधारेच्या व्यासपीठावर जाऊनही आपल्याला हवं ते मत मांडता येतं, त्यातून स्पष्ट झालं. प्रणवदा संघाच्या स्थानी गेले, हेडगेवारांचं कौतुक केलं, म्हणून ते संघविचारांचे झाले, असं अजिबात नाही, हे स्पष्ट झालं. तसंच प्रणवदांच्या भाषणामुळे संघ लगेच बदलेल, असंही नाही. पण वैचारिक मतभेद असू शकतात, अढी बाळगून मात्र पुढे जाता येत नाही. हे ठळकपणे समोर आलं. हेच या सगळ्याचं फलित म्हणावं लागेल.
शिवसेना अमित शहांवर
विश्वास ठेवेल का?
शिवसेना आणि भाजपमधले संबंध जगजाहीर आहेत. मोठा भाऊ कोण? शतप्रतिशत भाजप, १५० जागा, चिमूर ते पालघर लढत. एवढा सारा हा संघर्ष. हिंदुत्वाच्या धाग्याचा हा जसा इतिहास आहे तसाच तो एकमेकांवर कुरघोडी करण्याचासुद्धा इतिहास आहे. एकमेकांचा पाणउतारा करण्याची संधी एकवेळी विरोधक सोडतील. पण या दोन सहयोगी पक्षांनी ती कधीही सोडली नाही. एकेकाळी भाजपनं सेनेकडून विरोधी पक्षनेतेपद हिसकावून घेतलं होतं. अलीकडे तर या दोघांमधलं वैर हास्यास्पदरीत्या विकोपाला गेलंय. काँग्रेस, राष्ट्रवादीऐवजी सेनाच आक्रमक विरोधकाची भूमिका अगदी सत्तेत आल्यापासून निभावतेय. अफजलखान, सर्वात मोठा शत्रू, दगाबाज, या आरोपांच्या फैºया विरोधकांमध्ये नव्हे याच दोन पक्षांमध्ये झडल्यात. स्वबळाच्या डरकाळ्या फोडून झाल्या. तीन पायांची अडथळ्यांची शर्यत नकोच, यासाठी पुन्हा मनातल्या मनात आणाभाका घेतल्या गेल्या. पालघरच्या निवडणुकीत तर दोघांच्या मैत्रीची लक्तरे जाहीररीत्या टांगली गेली. शिवविरोधी सेना, कटकरस्थान, खंडणीखोर असे आरोप मुख्यमंत्र्यांनी केले. तर साम-दाम-दंड भेद, पैशांचं वाटप, लोकशाही धोक्यात यासारखे आरोप उद्धव ठाकरेंनी केले. सर्वात मोठा पक्ष असूनही कर्नाटकात भाजपचे हात पोळले गेले. शिवाय पालघर वगळता देशभरातल्या पोटनिवडणुकांमध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्यानंतर लोकसभेची मोठी लढाई आहे. त्यामुळेच की काय संपर्क फॉर समर्थन या गोंडस नावाखाली अमित शहांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ‘अफजलखाना’च्या या शिवभेटीचा आनंदसोहळा तर पार पडला. आजपर्यंत ही खेळी सामना से संघर्ष तक होती. आता एका रात्रीच्या भेटीनंतर ती संपर्क से समर्थन इथपर्यंत येणार का? दोन्ही पक्षांमध्ये एकीकडे उमेदवारांची पळवापळवी सुरू आहे, तर दुसरीकडे गळाभेट. शिवबंधन बांधलेले मनगट रक्त एकवटून कानाखाली आवाजाची भाषा करतात. हेच हात टाळीसाठी पुढे येणार का? वाजपेयी-अडवाणींच्या काळातली मातोश्रीभेटीची परंपरा मोदी-शहांच्या काळात खंडित झाली होती. आता या भेटीतून हा हिंदुत्वाचा तुटत चाललेला धागा जोडला जाणार का? दोन्ही पक्षांसमोरच्या संधी नेमक्या काय आहेत आणि धोके कोणते आहेत? दोघांचे कमकुवत दुवे काय आहेत? आणि सशक्त स्थानं कोणती आहेत? अपमान पचवून शिवसेना अमित शहांवर विश्वास ठेवेल का? पोटनिवडणुकीतल्या पराभवानंतर भाजपला मित्रपक्षांचं महत्त्व समजलंय असं मानायचं का? आणि अमित शहा यांनी चार वर्षांची कोणती कामगिरी उद्धव ठाकरेंना सांगितली असेल?
भाजपच्या अश्वाला पोटनिवडणुकांमध्ये लगाम लागला, म्हणून आज भाजप भानावर आलाय. तर स्वबळाचा नारा देऊनही वास्तवाचं भान असल्यानं शिवसेना सत्तेत आहे. आज भाजप जात्यात आहे. उद्या कदाचित सेना असेल. यात निवडून देणारा मतदार येतोच कुठे? प्रत्येक राजकीय पक्षाचे आडाखे ठरलेले असतात. आपण जनतेला बांधील नाही, काँग्रेस या मित्रपक्षाला बांधील आहोत, हे एच.डी. कुमारस्वामींचं विधानच शेवटी राजकारणात सत्य असतं. या भेटीत काहीही घडलं असलं तरी ते फारतर राजकारणाला कलाटणी देणारं असेल, पण लोकांच्या भवितव्याला कलाटणी देणार असणार का?, हा खरा सवाल आहे.

Web Title:  Will the team change immediately because of Pranabad's speech?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.