...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:53 AM2024-05-20T11:53:34+5:302024-05-20T11:54:58+5:30

loksabha Election - २०१९ च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरला होता असा दावा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनं केला आहे. 

Loksabha Election - Deal between Uddhav Thackeray and Sharad Pawar to make Supriya Sule Chief Minister - Ajit Pawar group claims | ...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा

...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा

सांगली - Umesh Patil on Sharad Pawar ( Marathi News ) भाजपासोबतच्या चर्चेत सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार नसल्यानं शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला आणि महाविकास आघाडी सरकार बनवलं. सुप्रिया सुळे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी त्याचवेळी उघड केले असते तर त्यांच्या नावाला पक्षातंर्गत समर्थन मिळाले नसते. पक्ष फुटला असता हे शरद पवारांना माहिती होतं म्हणूनच सुप्रिया सुळे हे डील उद्धव ठाकरे, संजय राऊत व शरद पवार या तिघांनी गुप्त ठेवले आणि महाराष्ट्राच्या माथी कसलाही प्रशासकीय व संसदीय कामाचा अनुभव नसलेला मुख्यमंत्री लादला असा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

उमेश पाटील म्हणाले की, २००४ साली एक वेळा खासदार व तीन वेळा आमदार राहिलेले अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी सक्षम, अनुभवी नव्हते. डॉ. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड,आर.आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनिल तटकरे या सारखे ३ ते ४ वेळा आमदार राहिलेले, मंत्रीपदाचा अनुभव असलेले मातब्बर नेते जर मुख्यमंत्री पदासाठी सक्षम नव्हते, तर २०१९ ला एकदाही आमदार ,खासदार नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेचाही अनुभव नसलेले, प्रशासनातील काहीच अनुभव नसणारे उद्धव ठाकरे पवार साहेबांच्या दृष्टीने मुख्यमंत्री पदासाठी 'सक्षम' व 'अनुभवी' कसे झाले? असा सवाल त्यांनी विचारला. 

तसेच २०१९ साली भाजपासोबतच्या डीलमध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळणार नव्हते परंतु महाविकास आघाडी स्थापन करताना पहिले अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री व पुढील अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री हा गुप्त फॉर्म्युला ठरला होता. शिवसेनेचे तत्कालीन गटनेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. त्यांना बहुतेक सर्व आमदारांचे समर्थन देखील होते परंतु संजय राऊत व अनिल देसाई यांनी पवारांच्या समोर पुढील अडीच वर्षासाठी सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याच्या मोबदल्यात पवारांनी महाविकास आघाडीचे निमंत्रक म्हणून पहिल्या अडीच वर्षासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडावा असा प्रस्ताव समोर ठेवला. नंतरच्या अडीच वर्षासाठी स्वत: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील असे ठरले होते असंही ठरल्याचा दावा उमेश पाटलांनी केला. 

दरम्यान, २००४ साली शक्य असताना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री न बनवण्यामागे त्या पदासाठी राष्ट्रवादीमध्ये अनुभवी, सक्षम नेते उपलब्ध नव्हते हे फक्त सांगायचे कारण आहे. केवळ सुप्रिया सुळेंना भविष्यात राष्ट्रवादीचा पहिला मुख्यमंत्री करण्याचा दूरदृष्टीकोनातून आणि पुत्री प्रेमापोटीच अजितदादांसह अनेक जेष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री पदापासून लांब ठेवले गेले व पक्षाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असा आरोपही उमेश पाटील यांनी केला.

वस्तूस्थिती तरुणांना माहिती व्हावी यासाठी हे सांगणं गरजेचे

शरद पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्याबद्दल आदर आहेच. मात्र शरद पवार यांनी अजित पवार व भुजबळांबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलणे गरजेचे असून आजच्या तरूण पिढीला व सर्वच कार्यकर्त्यांना तत्कालीन परिस्थिती, घडामोडी, त्यानंतरच्या घडामोडी याबाबत माहिती असणे आवश्यक आहे म्हणून वस्तुस्थिती मांडल्याचे उमेश पाटील म्हणाले. २००४ ला अजित पवार सक्षम नव्हते हा केवळ शरद पवार यांचा बहाणा आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व देण्याचे स्वप्न तेव्हापासून होते. त्यामध्ये अडथळा नको, पक्षातील अजित पवार किंवा अन्य नेत्याला मुख्यमंत्री करून पक्षात समांतर नेतृत्व तयार होऊ नये म्हणूनच मुख्यमंत्री पद घ्यायचे टाळले गेले असा थेट आरोपही उमेश पाटील यांनी केला.

भाजपासोबत जायचं ठरलं होतं...

राज्यात २०१९ मध्ये भाजपसोबत जायचे नक्की झाले होते. सर्वांची सहमती होती, शरद पवारांच्या परवानगीने व सूचनेप्रमाणे सर्व प्रक्रिया सुरू होती. मात्र तरीही ऐनवेळी निर्णय बदलण्यात आला. कारण अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे व त्यानंतरची अडीच वर्षे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे असे डील ठरले होते. म्हणूनच भाजपासोबत जाण्याचा निर्णय ऐनवेळी बदलण्यात आला. त्यावेळी सर्वच आमदारांनी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असतील तर सेनेसोबत करण्यात येणार्‍या डीलमध्ये सरकारमध्ये येऊ असे स्पष्ट केले. पहाटेचा शपथविधी मोडून अजित पवार सर्व आमदारांच्या प्रेमापोटी परत आले व त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपद देणे भाग पडले असेही उमेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: Loksabha Election - Deal between Uddhav Thackeray and Sharad Pawar to make Supriya Sule Chief Minister - Ajit Pawar group claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.