ताठ कण्याचा प्रतिभावंत लेखक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:31 AM2020-05-19T04:31:13+5:302020-05-19T04:32:11+5:30

मतकरी यांचा जन्म मुंबई १७ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. रॉबर्ड मनी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर राममोहन इंग्लिश स्कूलमधून १९५४ मध्ये ते एस.एस.सी. उत्तीर्ण झाले.

Talented writer of rigid grains | ताठ कण्याचा प्रतिभावंत लेखक

ताठ कण्याचा प्रतिभावंत लेखक

googlenewsNext

-  महेश केळुसकर
(ज्येष्ठ साहित्यिक)

रत्नाकर मतकरी यांचे वडील रामकृष्ण विठ्ठल मतकरी हे १९३०च्या दशकातील एक विद्याव्यासंगी वाङ्मयसेवक म्हणून प्रसिद्ध होते. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व असलेल्या रा. वि. मतकरी यांनी ‘संदेश’, ‘मौज’, ’प्रमोद’ या साप्ताहिकांमधून गडकऱ्यांच्या त्या काळी गाजत असलेल्या नाटकांवर टीकालेख लिहिले, त्यामुळे ते नाट्यवाङ्मयाचे दर्दी टीकाकार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या या नि:पक्ष टीकादृष्टीचे संस्कार रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यलेखनावर
आणि लेखक म्हणून एकंदरीतच आचार-विचारांवर झालेले पाहावयास मिळतात. एक चतुरस्र प्रतिभेचा आणि ताठ कण्याचा या काळातील मोठा लेखक,कलावंत म्हणून १७ मे २०२० रोजी वयाच्या ८१व्या वर्षी रत्नाकर मतकरी यांनी एक्झिट घेतल्याची बातमी कळल्यावर टी.व्ही. वाहिन्यांवरून आणि समाजमाध्यमांवर साहित्य व नाट्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्याबद्दल ज्या जिव्हाळ्याने आठवणी सांगितल्या, त्यावरून मतकरी हे एक दुर्मीळ रसायन
होतं, असं म्हणावं लागेल. एकाच वेळी सत्य
अणि न्यायाची बाजू घेत परखड विश्लेषण करीत राहणं आणि सहृदयतेने सर्जनशीलतेबाबत कमालीची
आस्था बाळगत चारी दिशांना लोकप्रियता मिळविणं, आदर मिळविणं मराठीत आजघडीला सोपं राहिलेलं नाही; पण रत्नाकर मतकरी यांनी आपल्या प्रतिभाशक्तीनं ते साध्य केलं.
मतकरी यांचा जन्म मुंबई १७ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. रॉबर्ड मनी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर राममोहन इंग्लिश स्कूलमधून १९५४ मध्ये ते एस.एस.सी. उत्तीर्ण झाले. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक वेळा पहिला क्रमांक पटकाविला होता. १९५४-५५ मध्ये ‘नवशक्ती’मधून झालेल्या रंग स्पर्धांमध्ये रत्नाकर रामकृष्ण मतकरी या तरुणाने पहिला क्रमांक मिळवून त्यातील ‘नाईटस् आॅफ द राऊंड टेबल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एमजीएमने लावलेल्या स्पर्धेत १०० रुपयांचे बक्षीस मिळविले. चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि नाट्य स्पर्धांमधून उत्कृष्ट परफॉर्मन्स देत एलफिन्स्टन कॉलेज गाजवून सोडणाºया रत्नाकर मतकरी यांनी (तत्कालीन) बॉम्बे युनिव्हर्सिटीचा प्रतिनिधी म्हणून इंटर-युनिव्हर्सिटी यूथ फेस्टिव्हलमध्येही प्रभावी कामगिरी केल्याची नोंद इतिहासकार गुं. फ. आजगावकर यांनी करून ठेवली आहे. (संदर्भ- कुडाळदेशकर (इतिहास आणि व्यक्ती) प्र. आ. १९५५)
वयाच्या १७व्या वर्षांपासून रत्नाकर मतकरी आकाशवाणीशी जोडलेले होते. ‘वेडी माणसे’ ही त्यांनी लिहिलेली श्रुतिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ‘युववाणी’ कार्यक्रमात १६ फेब्रुवारी १९५५ रोजी प्रसारित झाली. त्यानंतर मग त्यांची किती नाटकं, व्याख्यानं, मुलाखती आकाशवाणीवरून झाल्या, याची गणती खूपच होईल. २००५ मध्ये मी ‘महानायक’ या महामालिकेची निर्मिती करीत असताना मराठी रंगभूमीवर अनेक मोठे अभिनेते आणि अभिनेत्री अभिवाचन करण्यासाठी मुंबई केंद्राच्या स्टुडिओत येत होते.
नाटक -सिनेमावाल्यांच्या दुनियेत या ‘महानायक’ मालिकेबद्दल चांगली चर्चा होत होती. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत होती. एकेदिवशी मतकरी
सर माझ्यासमोर खुर्चीत येऊन बसले आणि त्यांनी थेट प्रश्न केला, ‘केळुसकर, ‘महानायक’साठी एवढे सगळेजण वाचायला येत असताना तुम्हाला मला फोन करावासा वाटला नाही?’ मी तर एकदम गांगरूनच गेलो. चाचपडत म्हटलं, ‘सर, पण एक मोठा लेखक दुसºया ज्युनिअर मोठ्या लेखकाची कादंबरी वाचण्यासाठी रेडिओवर येईल असं डोक्यात नाही आलं.’ तेव्हा मतकरी सर हसून म्हणाले, ‘मी मोठा अभिवाचकही आहे केळुसकर. बघाच तुम्ही एकदा मी कसं वाचतो ते.’ आम्ही त्यांना निवडक पानं दिली. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी मतकरी सर आले आणि ५ भाग म्हणजे २०-२२ छापील पृष्ठे त्यांनी एका दमात वाचून ‘वांचिक अभिनय’ म्हणजे काय सीरिअस प्रकार असतो, याचा वस्तुपाठ घालून दिला.
आणीबाणी असो की एन्रॉन प्रकरण, मतकरींनी स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका घेतली. व्यवस्थेच्या विरोधी भूमिका घेताना आपले लेखक म्हणून हितसंबंध बिघडतील की काय, अशी भीती कधीच बाळगली नाही. कणा ताठ ठेवला. साहित्य संस्थांमधील राजकारणाची पत्रास न बाळगता तथाकथित चमकदार दुटप्पी लोकांना तोंडावर सुनावणारा लेखक म्हणून मतकरी प्रसिद्ध होते. २०१८ मध्ये बालसाहित्यातील योगदानाबद्दल ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार त्यांना मिळाला. त्याबद्दल आनंद व्यक्तकरून, अकादमीच्या गलथानपणाबद्दल आणि अंतर्गत राजकारणाकडे निर्देश करताना मतकरी म्हणाले होते, ‘तरी पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या लेखनाला आज बालसाहित्य पुरस्कार मिळणं म्हणजे गंमतच आहे. तेव्हा यासाठी पुरस्कार देणाºया यंत्रणा आणि त्यावरील परीक्षक समितीने कायम सजग राहायला हवं. त्या - त्या काळातील
नेमकी माणसं हुडकून काढता यायला हवीत.’ पुरस्कारांच्या पलीकडचा लेखकच असं बोलू
शकतो. सलाम!

Web Title: Talented writer of rigid grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.