शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जेठमलानींचे वाग्बाण

By admin | Updated: October 6, 2015 04:15 IST

देशाचे माजी विधीमंत्री आणि सध्याचे राज्यसभा सदस्य अ‍ॅड. राम जेठमलानी हे मनात येईल ते बोलून मोकळे होणारे गृहस्थ आहेत. आपल्या बोलण्याने कोण कुठवर दुखावेल

देशाचे माजी विधीमंत्री आणि सध्याचे राज्यसभा सदस्य अ‍ॅड. राम जेठमलानी हे मनात येईल ते बोलून मोकळे होणारे गृहस्थ आहेत. आपल्या बोलण्याने कोण कुठवर दुखावेल याची पर्वा ते सामान्यपणे करीत नाहीत. किंबहुना पुढच्या माणसाला घायाळ करण्यासाठीच आपले वाग्बाण ते सोडत असतात. आताच्या घटकेला त्यांच्या निशाणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे आहेत. ‘मोदींनी देशाची फसवणूक केली’ असा त्यांचा सरळ आरोप असून २०१४ च्या निवडणुकीत आपण त्यांना मदत केल्याचा आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मोदी बोलतात फार पण करीत फारसे काही नाहीत, गरीबांविषयीचा त्यांचा कळवळाही खरा नाही आणि विदेशात दडलेला स्वदेशी पैसा परत आणण्याबाबत ते फारसे उत्सुकही नाहीत, असे देशाच्या या ज्येष्ठ विधिज्ञाचे म्हणणे आहे. मोदींची भाषा विकासाची असली तरी आपल्या हाती सत्तेचे केंद्रीकरण करण्यापलीकडे त्यांची दृष्टी जात नाही असेही ते म्हणाले आहेत. विदेशात भारताचे ९० लक्ष कोटी एवढे प्रचंड धन दडविण्यात आले असून तो अपराध करणाऱ्यांची नावे सरकारला ठाऊक आहेत. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या जर्मनीच्या चॅन्सेलर (पंतप्रधान) अ‍ॅँजेला मेर्केल यांनी अशा १४०० अपराध्यांची नावे भारताला सांगण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी भारत सरकारने आम्हाला एक विनंतीपत्र द्यावे एवढीच त्यांची अट आहे. मोदींचे सरकार तसे पत्र लिहित नाही आणि दडलेल्या धनाबाबत ते फारसे चिंतीतही नाही असे सांगून जेठमलानी म्हणतात, हा पैसा आला तर देशाच्या आजच्या सर्व आर्थिक अडचणींवर तो मात करू शकेल. याच प्रकरणात त्यांनी अरुण जेटली व चिदंबरम यांना दोषी धरून त्यांच्यावरही रीतसर खटले दाखल करण्याची मागणी केली आहे. ही माणसे फक्त बोलत आली, प्रत्यक्षात मात्र त्यांनी काहीच केले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. बिहारमधील पाटणा येथे कुठल्याशा खटल्याच्या व आंदोलनाच्या संबंधात आलेल्या जेठमलानी यांनी अशी टीका करतानाच ‘बिहारी जनतेने नितीशकुमार यांनाच निवडून दिले पाहिजे’ असे आवाहनही केले आहे. नितीशकुमार हे देशाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते होण्यास पात्र असल्याचे प्रशस्तीपत्रही त्यांनी यावेळी देऊन टाकले. या पत्राचा नितीशकुमारांना निवडणुकीत किती फायदा होतो हे स्पष्ट नसले तरी त्याने जेठमलानी आणि त्यांचा जुना भारतीय जनता पक्ष यात आलेल्या वितुष्टाचे विद्रुप स्वरुप देशाला दाखवून दिले आहे. जेठमलानी हे सामान्य वकील नाहीत. देशातील सर्वाधिक आघाडीच्या दहा विधीज्ञात त्यांचा समावेश होतो. राजकारणाचे ते अतिशय अभ्यासू भाष्यकार आहेत आणि सध्याच्या सत्तारुढ भाजपाला तिच्या प्रत्येक अडचणीत त्यांनी मदतही केली आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात विधीमंत्री म्हणून काम करीत असताना न्यायप्रणाली व कायदे यात महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणण्यातही त्यांनी पुढाकार घेतला आहे. वाजपेयी त्यांच्याबाबत सदैव कृतज्ञपणाने बोलत तर अडवाणींनाही त्यांचा नेहमीच विश्वास वाटला आहे. आता वाजपेयी निवृत्त आहेत आणि अडवाणींच्या वाट्याला सक्तीची निवृत्ती आली आहे. याच दरम्यान पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर टीका केल्याच्या आरोपावरून जेठमलानींना पक्षाने निलंबितही केले आहे. त्यामुळे पक्षात त्यांचे वजन कोणी लक्षात घेत नसेल तर ते समजण्याजोगे आहे. मात्र त्यांचा समाज, देश व माध्यमातील मान मोठा आहे. त्यांच्या स्वभावात व वागण्यात लक्षात येईल असे एक तऱ्हेवाईकपण, शिवाय कोणत्याही प्रश्नावर तत्काळ प्रतिक्रिया देण्याएवढे ते जास्तीचे संवेदनशीलही आहेत. कमालीची स्वतंत्र विचार करणारी आणि तो विचार तेवढ्याच जोरात बोलून दाखविणारी माणसे संघटनेत किंवा कोणत्याही कळपात फार काळ टिकत नसतात. संघटनेच्या शिस्तीला, नेत्यांच्या आज्ञेला आणि तेथील वरिष्ठांच्या नजरेला भिऊनच तीत काम करावे लागते. ही स्थिती जेठमलानींसारख्या सर्वतंत्रस्वतंत्र व्यक्तीला मानवणारी नाही. मात्र तेवढ्यावरून त्यांच्या मागणी वा म्हणण्यातले तथ्य नाकारणे कोणालाही जमणार नाही. त्यांच्याएवढा कायदेपंडित जेव्हा अशा कारवायांची मागणी करतो तेव्हा तिची शहानिशा गंभीरपणे केली जाणेच आवश्यक आहे. २०१४ ची निवडणूक लढवताना, सत्तेवर आल्यानंतर विदेशात दडलेले धन आम्ही देशात आणू अशा वल्गना भाजपने केल्या. २००४ आणि २००९ च्या निवडणुकीतही त्या पक्षाने त्या केल्याच होत्या. ही माणसे एवढ्या जोरात विदेशी पैशाविषयी आकडेवारीनिशी बोलतात तेव्हा त्यात काही तथ्य असलेच पाहिजे असे जनसामान्यांना वाटत आले. या पुढाऱ्यांतल्या काहींनी विदेशातून आणलेला पैसा आम्ही जनतेत वाटू व तसे झाले तर प्रत्येक नागरिकाला किमान १५ लक्ष रुपये मिळतील असे स्वप्न दाखविले होते. मोदींच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत त्या पैशाची वाट पाहणारे तसेच ताटकळत राहिले आहेत. एवढ्या प्रचंड देशाची एवढी फसवणूक करणे हे राष्ट्रीय पातळीवरील पुढाऱ्यांनाच जमणारे आहे. ती फसवणूक सारेच अनुभवत आहेत. जेठमलानी यांनी या फसवणुकीला आता वाचा फोडली आहे. सरकार तिची दखल घेणार नसले तरी जनतेत ती घेतली जाणारच आहे.